

सासष्टी: यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने मासेमारी उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी गोव्यातील मच्छीमार मात्र आशावादी आहेत.
त्यांच्या मते, जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा आणि समुद्रातील मासळी उत्पादनाचा थेट संबंध नसून समुद्रातील हवामान व प्रवाह यावरच मासेमारीचे यश अवलंबून असते. राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी संपत असून १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात होणार आहे.
सध्या मच्छीमारांची खरी चिंता कमी पावसाची नसून समुद्रातील वादळी वातावरणाची आहे. पारंपरिक अनुभवांनुसार या काळात आतापर्यंत तीन चक्रीवादळे येणे अपेक्षित असते. मात्र, यंदा अद्याप तसे झालेले नाही. समुद्र अजूनही पूर्णपणे शांत झालेला नसल्याने परिस्थितीवर मच्छीमार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ट्रॉलर्सपेक्षा स्थानिक बनावटीच्या बोटी व होड्यांसाठी सध्याची परिस्थिती काही प्रमाणात अनुकूल असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
‘गोंयच्या रापणकारांचो एकवट’ संघटनेचे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिग्स यांनी सांगितले की, कमी पावसामुळे मासळी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. हवामान अनुकूल राहिल्यास पारंपरिक बोटी समुद्रात उतरू शकतील. मात्र, हंगामाच्या सुरवातीलाच चक्रीवादळे आली, तर बोटी समुद्रात नेता येणार नाहीत. अशावेळी मासे समुद्राच्या वरच्या भागात न राहता खोल पाण्यात जात असल्याने मासेमारी कठीण बनते.
बोटमालक पॅट्रिक डिसिल्वा आणि सावियो डिसिल्वा यांनीही हीच भूमिका मांडली. गेल्या वर्षी वादळी हवामानामुळे काही बोटी काही दिवस कारवार बंदरात सुरक्षित ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे यंदाही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच मासेमारीचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.