पणजी: काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यामुळे आगामी जिल्हा पंचायत आणि गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) काँग्रेससोबत युती करणार नाही, स्वतंत्रपणे लढेल. निवडणुकीनंतर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये यासाठी ‘आप’ चारित्र्यवान, फुटू न शकणाऱ्या नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी देईल, असे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा ‘आप’च्या ज्येष्ठ नेत्या आतिशी मार्लेना यांनी सांगितले.
आतिशी यांनी सोमवारी ‘गोमन्तक’ कार्यालयास भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेससोबत युती न करता स्वतंत्ररीत्या लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘याचा लाभ मतांचे विभाजन होऊन भाजपला होणार नाही का?’ असा प्रश्न विचारला असता आतिशी म्हणाल्या, काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष आहे.
युतीत असलेल्या पक्षांचे खच्चीकरण करणे हेच काँग्रेसचे ध्येय आहे. त्याचा फटका मध्यप्रदेश, हरयाणा, गुजरात आदी राज्यांतील निवडणुकांमध्ये ‘आप’सह इतर पक्षांना बसला आहे. ‘२०२७च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवारीवर निवडून येणारे आमदार भाजपमध्ये कशावरून जाणार नाहीत?’ या प्रश्नावर, अधिकाधिक उमेदवार ‘आप’चा ‘डीएनए’ असलेले नवे चेहरे असतील, असे आतिशी यांनी विश्वासाने सांगितले.
‘आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकांवेळी जनतेसमोर जाण्यासाठी तुमच्याकडे कोणता मोठा मुद्दा आहे?’ असा प्रश्न विचारला असता आतिशी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार त्या पक्षासोबतच राहतील यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.
पण, २०२२च्या निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवारीवर निवडून आलेले व्हेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा हे दोन्ही आमदार अजूनही पक्षासोबत ठाम आहेत. लोकांचे प्रश्न ताकदीने ते विधानसभेत मांडत आहेत. त्यामुळे जनतेचा ‘आप’वर विश्वास आहे आणि हाच मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.