
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणार असल्याचे आश्वासन चार वर्षांपूर्वी दिले होते. मात्र खड्डे कायम आहेत. ज्या रस्त्यांची डागडुजी मान्सूनपूर्वी करण्यात आली होती, त्याच रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही राज्यभर ‘भाजपचे बुराक’ स्वाक्षरी मोहीम राबविणार असल्याचे ‘आप’चे नेते ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.
येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालेकर बोलत होते. यावेळी सृजन सिग्नापूरकर आणि श्रीकृष्ण परब उपस्थित होते. पालेकर म्हणाले, आम्ही राज्यातील जनतेपर्यंत जाऊन स्वाक्षरी घेणार आहोत. नंतर ही पत्रे मुख्यमंत्री तसेच नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांना देणार आहोत. जनतेला आपल्या हक्कांबाबत जागृत करणार आहोत.
मंत्री दिगंबर कामत यांनी खात्याचा पदभार घेतल्यावर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची शपथ घेतली आहे. बार्देशातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी १५ कोटींची निविदा काढण्यात आली. काम पूर्णही झाले. परंतु दोनच महिन्यांत रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न सिग्नापूरकर यांनी केला.
मागील पाच वर्षांत पणजी महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १४०० कोटींची कामे करण्यात आली. तरी देखील रस्त्यांवर खड्डे दिसत आहेत. ज्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले, तो सध्या भाटले येथे काम करत आहे. पाच वर्षांत पणजीत मनपा, साबांखा, जी-सुडा, इमॅजिन पणजीतर्फे कामे करण्यात आली. परंतु खड्डे काही कमी झालेले नाहीत. या कामांचे ऑडिट होणे गरजेचे आहे, असे अमित पालेकर यांनी सांगितले.
राजधानी पणजीतील सर्वच रस्त्यांची पुढील काहीच दिवसांत दुरुस्ती आणि डागडुजी केली जाईल, असे मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.