पणजी: कोलवाळ कारागृहाची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये तत्कालीन कारागृह महानिरीक्षक एल्विस गोम्स यांनी सरकारकडे पाठवला होता. त्या प्रस्तावावर सरकारने विचार न केल्याने आजवर कारागृहाची सुरक्षा व्यवस्था बेभरवशाचीच राहिली असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
राज्य प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात असणारे कैदी दिवसभर तेथे बेचैन अवस्थेत असतात. यामुळे ते अमली पदार्थांचा सहारा घेतात. त्यासाठी ते कितीही किंमत मोजण्याची तयारी ठेवतात. ते किंवा त्यांचे नातेवाईक ही किंमत परस्पर अदा करतात. यामुळे कागदावर तिमाही पद्धतीने सुरक्षा व्यवस्थेतील जवान बदलण्याची व्यवस्था असली तरी प्रत्यक्षात वरकमाईला चटावलेले पुन्हा त्याच कामावर आपली बदली करून घेतात.
दिल्लीतील मुख्यालयाची हवी होती परवानगी
तत्कालीन कारागृह महानिरीक्षक एल्विस गोम्स यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्याचा प्रस्ताव दिला होता, हे मान्य केले.ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थानिक कमांडंटशीही चर्चा झाली होती.
त्या दलाच्या जवानांची गोव्यात बदली झाल्यावर सुरवातीला एक दोन महिने त्यांना कोलवाळ कारागृहाची सुरक्षा व्यवस्था पाहण्यास सांगता येईल, असे त्यांचे मत होते.अर्थात त्यासाठी दलाच्या दिल्लीतील मुख्यालयाची परवानगी आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते. यासाठी राज्य सरकारने रितसर प्रस्ताव द्यावा, असे त्यांनी सुचवले होते. त्यानुसार मी प्रस्ताव करून राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला होता; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
कमी पगार तरीही महागड्या गाड्या
कारागृह प्रशासनाशी संबंधित एका बड्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कारागृहातील कर्मचारी लांबवरून महागड्या गाड्या घेऊन कामावर येतात हे कोणालाच कसे दिसत नाही? त्यांचे वेतन काय? त्यातून कर्जाचे हप्ते वजा जाता किती वेतन मिळते, याचा हिशेब केला तर लांबून दररोज महागड्या कारने कामावर येणे त्यांना कसे काय परवडते, याचा विचार झाला पाहिजे. याचे उत्तर ‘वरकमाईच्या महामार्गात’ दडले आहे.
युरी आलेमाव यांनी व्यक्त केली चिंता
बेरोजगारी, महागाई, जमिनींची विक्री आणि प्रदूषणासह ड्रग्जचा प्रश्न गंभीर बनल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. अमली पदार्थांचे जाळे घरांपर्यंत आणि शाळांपर्यंत पोहोचत असून गोव्याच्या तरुणाईला त्याचा मोठा धोका निर्माण झाल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कोलवाळमधील प्रकार गंभीर आहे, असेही ते म्हणाले.
कोलवाळ कारागृहाचा कारभार सुधारणा म्हणून अनेक गोष्टी मी सुचवल्या होत्या. त्यावर वरिष्ठ पातळीवर विचार झाला नाही गोष्ट खरी आहे. निदान सुरक्षा व्यवस्था केंद्रीय यंत्रणेकडे सोपवण्याचा विचार तरी केला गेला पाहिजे होता.
- एल्विस गोम्स, तत्कालीन कारागृह महानिरीक्षक
कारागृहात असा आहे सुरक्षा क्रम
१. कारागृहाच्या सुरुवातीच्या फाटकावर गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे कर्मचारी असतात. दुसऱ्या फाटकावर गोवा सशस्त्र पोलिस दलाचे जवान असतात, तर अंतर्गत सुरक्षा व्यवस्था ही तिसऱ्या फाटका पासून कारागृहातील सुरक्षा यंत्रणेतील जवानांकडे असते.
२. या त्रिस्तरीय पद्धतीतील लोकांची कारागृहातील कैद्यांशी ओळख वाढू नये, यासाठी तिमाही पद्धतीने त्यांच्या कामात बदल करणे आवश्यक असते. तसे केलेही जाते; मात्र वशिला लावून तेच तेच जवान पुन्हा या तपासणीच्या कामावर येतात, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
३. कारागृहात टाकलेल्या प्रत्येक छाप्यावेळी अमली पदार्थ, मोबाईल व अन्य आक्षेपार्ह वस्तू सापडलेल्या आहेत. यावरूनच कारागृहाची सुरक्षा व्यवस्था किती बेभरवशाची आहे, हे स्पष्ट होते, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.