मडगाव: बीए एलएलबीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत ९ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याचे वृत्त दै. ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाची शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने दखल घेतली. तसेच या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांना दिले. लोलयेकर यांनी यासंदर्भात गोवा विद्यापीठाला दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
बुधवारी सायंकाळी लोलयेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच कारे आणि साळगावकर या दोन विधी महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गुणवाढ नेमकी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावण्यास सांगितल्याचे लोलयेकर यांनी सांगितले. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर उपस्थित राहणार होते; मात्र पूर्वनियोजित अन्य कामामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीए एलएलबीच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश परीक्षा कारे व साळगावकर विधी महाविद्यालयांमध्ये झाली होती; मात्र उत्तरपत्रिका गोवा विद्यापीठात तपासण्यात आल्या. सुरुवातीला विद्यापीठाने विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना ९ विद्यार्थ्यांचे गुण मोजताना तांत्रिक चूक झाल्याचे कारण देत विद्यापीठाने नवीन यादी प्रसिद्ध केली.
या नव्या यादीत संबंधित ९ विद्यार्थ्यांच्या (Student) गुणांत २० ते ५० गुणांपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात गोवा विद्यापीठाचे कुलसचिव सुंदर धुरी यांना विचारले असता, काही तांत्रिक कारणामुळे जुनी यादी बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ९ विद्यार्थ्यांचे गुण मोजताना तांत्रिक त्रुटी झाल्याने त्यांचे पूर्ण गुण पहिल्या यादीत दिसले नव्हते. एका विद्यार्थ्याने याबाबत विद्यापीठाशी संपर्क साधून ही चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर ती दुरुस्त करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, दुसरीकडे काही पालकांनी विद्यापीठाच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. गुणमोजणीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत राज्यातील सर्वोच्च शैक्षणिक संस्था पुरेशी काळजी घेत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही ठरावीक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून हा प्रकार मुद्दाम घडवून आणला का? अशी शंकाही पालकांनी व्यक्त केली आहे.
गोवा विद्यापीठाने जाहीर केलेल्या नव्या यादीत एका विद्यार्थ्याचे उदाहरण सर्वाधिक चर्चेत आहे. पहिल्या यादीत २८ गुणांसह ५५२व्या स्थानावर असलेल्या विद्यार्थ्याच्या गुणांत तब्बल ४९ गुणांची वाढ होऊन त्याचे एकूण गुण ७७ झाले. परिणामी तो थेट ९व्या स्थानावर पोहोचला. या घडामोडीमुळे प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रवेश परीक्षेला बसलेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. विद्यापीठाच्या गुणमोजणी पद्धतीबाबत गंभीर शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या पत्राची प्रत उच्च शिक्षण संचालकांनाही पाठविण्यात आली असून अनेक विद्यार्थी व पालकांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.