Sanquelim Pramod Sawant Meeting
साखळी: पंचायतीत निवडून आल्यानंतर पंच सदस्यांचे काम हे केवळ गटारे आणि रस्तेच बांधणे इतकेच नसून लोकांना सरकारी पातळीवर कशाप्रकारे सर्व योजना मिळणार व त्यांचे जीवन कसे सुखकर होणार यावर लक्ष द्या. लोकांशी जवळून ‘कनेक्ट’ व्हा, त्यांच्या समस्या समजून घ्या आणि त्यानुसार त्यांच्या आयुष्यात चांगले क्षण जोडा. तेव्हाच लोकांना प्रत्येक प्रतिनिधी हा आपला वाटेल, असा मंत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातील सर्व नगरसेवक, सरपंच, पंच सदस्यांना दिला.
राजकारण आणि राजकीय लाभ हे एका जागी, तर आपल्याला मिळालेली संधी व त्या संधीचा लाभ घेताना लोकांचे भले करण्याची इच्छा प्रत्येक प्रतिनिधीने बाळगावी. लोकांची कामे करताना आपण लोकांच्या मनात आपली सकारात्मक प्रतिमा कशी निर्माण करू शकतो याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. याच प्रतिमेवर आपली राजकीय प्रतिमाही भविष्यात उंच होणार आहे, असा सल्लाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.
साखळीतील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मतदारसंघातील सर्व सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस व्यासपीठावर नगराध्यक्ष सिध्दी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर यांची उपस्थिती होती.
पंचायतीत निवडून आल्यानंतर पंचायतींकडून केवळ गटारे व रस्तेच बांधणे म्हणजेच विकास नव्हे. पंचायतींना मिळणाऱ्या विशेष निधीतून प्रभागांमध्ये निधी वाटून केवळ गटारे बांधण्यातच धन्यता मानतात. काही गटारांचा दर्जा तर इतका खराब असतो, की ती गटारे पहिल्याच पावसात वाहून जातात. त्यानंतर नव्याने तीच गटारे बांधण्यासाठी प्रयत्न केले जाते. हे सत्र थांबवा. पैशांचा हा अपव्यय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंचायतींतर्फे गावातील प्रत्येक साधनसुविधा विकासाला आपण आमदार व मुख्यमंत्री या नात्याने पूर्णपणे सहकार्य करणार, पण त्यासाठी केवळ गटारे आणि रस्ते हेच प्रकल्प घेऊन न येता गावात उभा राहणारा वेगळा असा प्रकल्प घेऊन या. गटारे व रस्ते बांधून विकास झाला असे म्हणता येणार नाही. या विकासाबरोबरच लोकांना आपापसातील राजकारण बाजूला ठेवून सर्वप्रकारचा लाभ देण्यासाठी काम करा, असा सल्लाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.
कचऱ्याची समस्या ही आज जटिल बनत आहे. या समस्येवर गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आपण काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. कचरा व्यवस्थापन योग्य करा. साखळी मतदारसंघातील केवळ हरवळे पंचायत वगळता इतर सर्व पंचायतींमध्ये कचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. साखळी नगरपालिका आपल्यापरीने कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे, पण ते अधिक सुधारण्याची गरज आहे. एमआरएफ शेड उभारा, कचरा कंत्राट नेमा. कचऱ्यासाठी सरकार पैसे देते त्याचा योग्य वापर करताना गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बऱ्याच पंचायतींना आपल्या पंचायतीकडे आपल्या खात्यांवर पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे असल्याचे माहितीही नाही. त्यांनी या पैशाची माहिती करून घेत आपल्या गावात किंवा पंचायत क्षेत्रात कशाप्रकारचा चांगला समाजोपयोगी प्रकल्प आणू शकतो यावर विचार करा. कचरा व्यवस्थापनासाठीही या पैशांचा वापर होऊ शकतो याकडेही लक्ष द्या, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.