Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: पदाधिकारी सावध...‘नो कॉमेंट्स’

Khari Kujbuj Political Satire: मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचे काही अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे व खात्यातील आपल्या विश्‍वासातील कर्मचाऱ्यांना दस्तावेज पडताळून व त्याची तपासणी करून स्वच्छतेचे काम करावे असा सल्ला दिला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पदाधिकारी सावध...‘नो कॉमेंट्स’

मुख्यमंत्र्यांनी रविवारी आपला स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ व्हायरल केला होता. आपल्यावर होत असलेल्या कुरघोडीबाबतीत त्यांचे हे स्पष्टीकरण. विरोधकांकडून आपल्या सरकारची बदनामी होत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ पक्षाच्या विविध व्हॉट्सॲप ग्रुपमधून व्हायरल झाला. काही पदाधिकाऱ्यांकडून या व्हिडिओचे समर्थनही झाले, तर काहींनी सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे. व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची भूमिका काहींनी स्वीकारली असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय सदस्य नोंदणीलाही राज्यात म्हणे हवा तसा प्रतिसाद मिळाला नसण्याच्यामागे पदाधिकाऱ्यांची नाराजी असल्याचे आता चर्चिले जात आहे. यावरून पक्षश्रेष्ठी काय बोध घ्यायचा ते घेतील आणि सुधारणेचे पाऊल उचलतील, अशी काहींना अनेक पदाधिकाऱ्यांना अपेक्षाही आहे. ∙∙∙

स्वच्छतेचे काम जोशात!

राज्यात सध्या सरकारी कार्यालयात स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व सरकारी खात्यांना नको असलेला दस्तावेज तपासून तो रद्दीत काढण्याच्या सूचना केल्यापासून अनेक अधिकारी कामाला लागले आहेत. काहींनी तर दैनंदिन कामांकडे अधिक लक्ष न देता कार्यालय स्वच्छ करण्यावर भर दिला आहे. या स्वच्छतेच्या वेळी काही महत्वाची कागदपत्रे गहाळ होणार नाही म्हजणे मिळवले. नाहीतर कामाचा दस्तावेज नाही, त्याच्याबरोबर आवश्‍यक व महत्वाचा दस्तावेजही गायब होण्याची शक्यता अधिक आहे. ज्यांनी खात्यामध्ये घोटाळे केले आहेत व त्याची वाच्यता अजूनही झालेली नाही ते दस्तावेज कर्मचाऱ्यांकडूनच गायब होऊ शकतात. त्यानंतर स्वच्छतेच्या नावाखाली दस्तावेज गहाळ झाले, असे म्हणण्याची पाळी येईल व नाहक खात्याच्या अधिकाऱ्याला त्याचा मनस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचे काही अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे व खात्यातील आपल्या विश्‍वासातील कर्मचाऱ्यांना दस्तावेज पडताळून व त्याची तपासणी करून स्वच्छतेचे काम करावे असा सल्ला दिला आहे. ∙∙∙

रेजिनाल्‍ड क्रूझवर नाराज आहेत का?

कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स हे तसे क्रियाशील असे आमदार. पण कित्‍येकदा त्‍यांना त्‍यांच्‍यावर कुणी टीका केली तर ती सोसवत नाही. अशावेळी टीका करणाऱ्यांना ते विटेच्‍या बदल्‍यात दगडाने प्रत्‍य‍ुत्तर देतात. काल रोमीवाल्‍यांनाही त्‍यांनी तशाचप्रकारे हाताळताना तुमची धमक्‍यांची भाषा येथे चालणार नाही, असे स्‍पष्‍टपणे सांगितले. रोमीचा प्रश्‍न फक्‍त वेळ्‍ळीचे आमदार क्रूझ सिल्‍वा यांनीच विधानसभेत मांडला, असा प्रचार ‘ग्‍लोबल कोंकणी फोरम’कडून केला जात आहे. रेजिनाल्‍ड यांचा त्‍यालाही आक्षेप आहे. रेजिनाल्‍ड म्‍हणतात, रोमीचा प्रश्‍न मीही विधानसभेत मांडला. मात्र क्रूझच्‍याच नावाचा उदो उदो का चालू आहे. रोमीचे श्रेय क्रूझ एकटेच लाटणार म्‍हणून रेजिनाल्‍ड नाराज आहेत का? ∙∙∙

सुदिन ढवळीकर यांचीच चर्चा

सुदिन अजूनही मुख्यमंत्री का झाले नाहीत? हा आज दै. ‘गोमन्तक’ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख फोंडा व मडकाई मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी समाज माध्यमावर तो प्रसृत केल्यामुळे तो बराच ‘व्हायरल’ झाला. सध्यस्थितीत मुख्यमंत्री म्हणून वीज मंत्री सुदिन ढवळीकर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो,असाही सूर या चर्चेतून निघतो आहे. तर काहींजण श्रेष्ठींनी एक संधी सुदिन यांना द्यायला हवी, असे सुचवले आहे. काही का असेना, पण गेले चार दिवस फोंड्यात कृषिमंत्री रवी नाईक यांच्या वाढदिवसावर सुरू असलेल्या चर्चेचा रोख आज या लेखामुळे सुदिन यांच्याकडे वळला, एवढे मात्र खरे. ∙∙∙

त्या प्रकल्पांचे काय होणार?

सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पामुळे उठलेला गदारोळ शिगेला पोहचलेला असतानाच परवा दोतोर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकल्पाला दिलेले परवाने मागे घेण्याचे संकेत नगरनियोजन यंत्रणेला देतानाच आणखी एक महत्वाची घोषणा केली व त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. ते म्हणाले की, यापुढे लोकांचा विरोध असलेल्या प्रकल्पांना सरकार थारा देणार नाही. या घोषणेमुळे भोम येथील तसेच धर्मापूर येथील रस्तारुंदीकरणाला विरोध करणारे स्थानिक, मरिना प्रकल्पाचे विरोधक यांना म्हणे बराच दिलासा मिळाला असून ते दोतोरांना धन्यवाद देताहेत. आता मुख्यमंत्र्यांना वरील प्रकल्पाचा संदर्भ द्यावयाचा होता की, त्यांनी सर्वसाधारणपणे हे विधान केले होते, वा ठोकून दिले होते ते त्यांचे त्यांनाच माहीत. कारण राजकीय नेत्यांना एखाद्या प्रकरणात उसळलेला धुरळा खाली बसविण्यासाठी, अशी विधाने करणे भाग पडते. एरवी भूतानी प्रकरण उपस्थित झाल्यापासून बाकीची अनेक प्रकरणे वा विषय बॅकफूटवर गेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. देशाच्या अन्य भागांत या दिवसात अनेक महत्वाचे विषय उपस्थित झालेले आहेत. पण गोव्यात त्याकडेही दुर्लक्ष झालेले आहे. ‘सब कुछ भूतानी’ अशीच आजची स्थिती आहे. त्या मुळे विरोध असलेले प्रकल्प सरकार पुढे नेणार नाही, या मुख्यमंत्र्यांचे विधान नेमके कोणाला लागू पडते हे महत्वाचे आहे. ∙∙∙

त्यांना कोणी बोलावले?

भंडारी समाजाला राजकीय आरक्षण हवे हा मुद्दा सध्या चर्चेला आला आहे. भंडारी नेत्यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याऐवजी कृषीमंत्री रवी नाईक यांना निवेदन का दिले याचीही चर्चा आहे. खरी चर्चा तर त्यापुढे सुरु झाली आहे. रवी नाईक यांच्या भेटीसाठी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी येणार होते. तशी कल्पना त्यांना देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी तेथे गोमंतक भंडारी समिती पोचली. छायाचित्रात तेही आले. त्यांना तेथे कोणी बोलावले, याची विचारणा नंतर नाईक यांनी अनेकांकडे केली. त्यामुळे कोडी लिलया सोडवणाऱ्या रवी नाईक यांना आपल्या दालनात ते कसे आले या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नाही. चमकोगिरी करणाऱ्या एका जोडगळीचा हात त्यामागे असावा असे बोलले जातेय. ते रवी यांच्यापर्यंत पोचले की नाही, याची माहिती मात्र मिळत नाही. ∙∙∙

राेमीवाल्‍यांना कसा प्रतिसाद मिळेल?

कोंकणीचे आंदोलन जर कुणी पाेटतिडकीने पुढे नेले तर ते सासष्‍टीतील ख्रिस्‍ती लोकांनी. त्‍यामुळे आता राेमी लिपीतील कोंकणीला राजभाषा कायद्यात स्‍थान मिळावे यासाठी ग्‍लोबल कोंकणी फाेरमने जे आंदोलन सुरु केले आहे त्‍याला सासष्‍टीत चांगला प्रतिसाद मिळणार, अशी अपेक्षा सर्वांनीच धरली होती. या मोहिमेची सुरूवात काल कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांच्‍या कार्यालयातून करण्‍यात आली. मात्र, या शुभारंभालाच त्‍यांना रेजिनाल्‍डकडून कानपिचक्‍या मिळाल्‍या. आता सासष्‍टीच्‍या ख्रिस्‍ती आमदारांकडून या राेमीवाल्‍यांना अशी वागणूक मिळत असेल तर उत्तर गोव्‍यातील हिंदू आमदारांना भेटल्‍यावर त्‍यांना कशी बरी वागणूक मिळेल? ∙∙∙

बांबोळीतील वाहतूक कोंडी सुटेना !

बांबोळी येथील गोमेकोसमोर वाहतुकीत सुरळीतपणा यावा म्हणून सरकारने अनेक योजना आखल्या ,त्यासाठी काही कोटी खर्च केले पण तरीही तेथील व्यवस्था सुरळीत होत नाही व लोकांची विशेषतः गोमेकॉत येणाऱ्यांचे हाल होताहेत ते तेथे वाटेल तशा पार्क केल्या जाणा-या वाहनांमुळे तसेच गोमेकॉबाहेर पथाऱ्या पसरणाऱ्या विक्रेत्यांमुळे. विविध सरकारी यंत्रणा तसेच संबंधित ग्रामपंचायतही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लोक आता करू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असतील तर त्यासाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या डोळ्यांना पाणी लावण्यापुरते या विक्रेत्यांना शिस्त लावली जाते, असे वेळोवेळी दिसून आलेले आहे. पण त्या नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असे चालते. गोमेकॉत येणाऱ्यांच्या वाहनांसाठी मागच्या बाजूला भरपूर पार्किंग व्यवस्था आहे पण प्रत्येकजण मिळेल तेथे विशेषतः सबवेबाहेरील रस्त्यावर वाहने पार्क करतो व वाहतूक कोंडी होते ती कशी दूर होणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

Goa Water Supply: '2047 पर्यंत आवश्यक पाण्याची तजवीज 2 वर्षांत करणार', जलसंपदा मंत्री शिरोडकरांचा दावा

Goa Crime: चिंताजनक! गोव्‍यासह देशभरात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ; NCRBच्या अहवालातून माहिती उघड

Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT