पणजी : राज्यातील उद्योगांनाच नव्हे तर सर्वच क्षेत्रात 50 वर्षांहून अधिक काळापासून अडथळे ठरणारे कायदे आहेत. असे शंभरावरील कायदे असून, ते येत्या दोन ते अडीच महिन्यांत हटविले जातील. त्याशिवाय काही कायद्यांमध्ये बदलही केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
पणजी जिमखान्याचा हॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी आयोजित गोवा राज्य औद्योगिक महामंडळाच्या उद्योग संघटनेच्या (जीएसआयए) वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योग मंत्री माविन गुदिन्हो, जीआयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, जीएसआयएचे अध्यक्ष दामोदर कोचकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, उद्योग व्यवसाय क्षेत्रात काही कायदे आहेत, ते नव्या उद्योगांना अडथळे ठरतात. त्यामुळे ते हटविणे आवश्यक आहे. हे कायदे हटविल्यानंतर उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सुलभपणा येईल. त्याशिवाय काही कायद्यांमध्ये बदल करण्याचे कामही हाती घेण्यात येईल. राज्यातील लहान-लहान होंडा, पेडणे, लाटंबार्से यासारख्या ठिकाणच्या औद्योगिक वसहातीतील वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्याचे कामही केले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात दिली. जीएसआयएचे कोचकर यांनी उद्योग क्षेत्रापुढे असणाऱ्या समस्या मांडल्या. याप्रसंगी मंत्री गुदिन्हो, रेजिनाल्ड यांनीही मत व्यक्त केले.
सप्टेंबरमध्ये मोपाचे उद्घाटन
मोपा विमानतळाचे उद्घाटन 30 ऑगस्टपर्यंत करण्याचा राज्य सरकारचा विचार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला करण्याचा काही सरकारचे नियोजन नाही. परंतु ते सप्टेंबरमध्ये केले जाईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उद्योगांचे कामही ऑनलाईन व्हावे
राज्य सरकारच्या अनेक खात्यांचे काम आता ऑनलाईन मोडवर जात आहे. त्यामुळे उद्योजकांनी आपापल्या उद्योगांचे कामही ऑनलाईन मोडवर नेणे आवश्यक आहे. कारखाना आणि बाष्पक महामंडळापुढे जर काही उद्योजकांचे विषय असतील, तर त्याची यादी करावी, ते दोन ते अडीच महिन्यांत मार्गी लावले जातील असे म्हणत सावंत यांनी उद्योजकांना हमी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.