वाळपई: चोर्ला घाटात सध्या मोठ्या ट्रकांच्या, डंपरच्या वाढत्या वर्दळीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. परवा रविवारी सायंकाळी ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवली. मागील काही दिवसांत या घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहने दरीत कोसळणे, मोठे ट्रक पलटणे तसेच अवजड वाहने रस्त्यातच बंद पडणे असे प्रकार घडत आहेत. चोर्ला-केरी परिसरात झालेले काही अपघात जीवघेणे ठरल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या लग्न, मुंज, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांचा हंगाम सुरू असल्याने गोव्यातील नागरिक खरेदीसाठी बेळगाव आणि कोल्हापूरकडे जात आहेत. पहाटे लवकर निघून दिवसभर खरेदी करून रात्री उशिरा परतताना अनेकजण घाटातून भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसून येते. घाटातील धोकादायक वळणांवर वेगावर नियंत्रण सुटल्याने अपघात घडत आहेत. अलीकडे ही स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यातच मोठ्या डंपर आणि अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने घाटातून प्रवास करताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतोय. ही बेलगाम वाहतूक नियंत्रणात आणणे गरजेचे बनले आहे.
नियमांनुसार या घाटातून दिवसभर अवजड वाहनांना बंदी असतानाही रेती, खडी वाहून नेणारे डंपर मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असल्याचे दिसते. गोव्यात बांधकामासाठी कर्नाटकातून पांढरी व लाल रेती तसेच खडीला मोठी मागणी असल्याने या वाहनांची संख्या वाढली आहे.
घाटात वेग मर्यादित ठेवा
वळणांवर विशेष खबरदारी घ्या
रात्री प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा
अवजड वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा
वाहनाची स्थिती तपासूनच प्रवास करा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.