फोंडा: शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बंद आहे. अनेक ठिकाणी बसविलेले कॅमेरे म्हणजे शोभेच्या वस्तू बनले आहेत. त्यामुळे शहरात बेशिस्त पार्किंग, चोऱ्या, गुन्हेगारी वाढत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळत नाही, अशी स्थिती फोंडा शहरात आहे. तरीही शासकीय यंत्रणा निद्रिस्त बनली आहे, असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे.
माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या प्रयत्नातून फोंडा शहरातील प्रमुख ठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, तेव्हा कोणीही गुन्हा करताना सावधगिरी बाळगत होते. गुन्हेगारीही कमी झाली होती, परंतु अलीकडे गुन्हेगारीचे प्रकारही वाढत आहेत. शहरात एकूण २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. ही यंत्रणा दुरुस्तीचे काम खासगी एजन्सीला दिले होते, पण या यंत्रणेचे दुरुस्ती न झाल्याने संपूर्ण यंत्रणाच बंद पडली आहे.
सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोंडा वाहतूक पोलिसांतर्फे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात होती. गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्यात सुद्धा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सगळीकडे बेशिस्त पार्किंगचे प्रकार वाढले असून वाहतूककोंडीचे वाढले आहेत. शहरातील सीसी टीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी खासगी दुकानातील कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शहरात आवश्यक ठिकाणी लवकर कॅमेरे बसविण्याची मागणी लोकांकडून होत आहे.
फोंडा पोलिसांनी अनेकवेळा संबंधित खात्याकडे, तसेच फोंडा पालिकेकडे अनेकवेळा सीसी टीव्ही बसविण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे. पण अद्याप सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याने पोलिसांची धावपळ उडत आहे.
फोंडा शहराच्या बाजूला असलेल्या कवळे, बोरी, कुर्टी- खांडेपार, बांदोडा व अन्य पंचायत क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. परंतु एक दोन पंचायती वगळता इतर पंचायत क्षेत्रामध्ये सीसी कॅमेरे बंद अवस्थेत आहे. काही पंचायत क्षेत्रातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला सुद्धा गेल्याच्या तक्रार पोलिस स्थानकात देण्यात आली आहे. पंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने रस्त्याच्या बाजूला कचरा कण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे कचऱ्यांचे ढिगारे वाढत आहेत. सरकारने फोंडा शहरासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत समाजसेवक विशाल फडते व्यक्त केले.
फोंडा शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. शहरात ‘हिट अँड रन’चे प्रकार घडत आहेत. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे अपघातावर सुद्धा नियंत्रण येऊ शकते. गुन्हेगारीत झालेली वाढ आणि वाढलेल्या अपघाताचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करावी, त्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असे मत विन्सेन्ट फर्नांडिस यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.