पणजी: दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये पक्षीय शिस्त अगंवळणी पडत आहे. त्यांनी पक्षाची विचारधारा स्वीकारली पाहिजे, काहीजणांना ती स्वीकारण्यास वेळ लागतो. २०२७ पर्यंत ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत, त्या दूर होतील, असे मत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले.
भाजपचा स्थापना दिन साजरा झाल्यानंतर पेडणे मतदारसंघातील भाजप मंडळाच्या भूमिकेविषयी विचारणा केली असता, नाईक म्हणाले, काहीतरी गैरसमजातून ती मते व्यक्त झालेली आहेत. त्याशिवाय मंडळाने बाबू आजगावकरांविषयी कोणताही ठराव घेतलेला नाही,असेही ते म्हणाले.
शिस्त अनसरून आम्ही याप्रकरणी पावले उचलू. नव्या आमदारांना किंवा कार्यकर्त्यांना अजूनही पक्षाची ओळख झालेली नाही. पक्षासाठी वर्ग असतात, त्या वर्गांना उपस्थित राहिले पाहिजे. पक्षाचा विचार स्वीकारला पाहिजे. २०१७ मध्ये भाजपमध्ये आलेले आमदार पक्षात रुळलेले आहेत, त्यांनी पक्षाची विचारधारा स्वीकारलेली आहे, ही चांगली बाब आहे. भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना पक्षात आलेल्यांनी पक्षाच्या विचारधारेनुसार काम करावे, हीच अपेक्षा असते.
दामू नाईक पुढे म्हणाले, पक्ष कार्यकर्ते सक्षम असतात, त्यांना नेता ध्येय-धोरणानुसार रहावा असे वाटते. पक्ष चांगल्या हाती असल्याचे हे २०२७ पर्यंत दिसेल. लोकशाही असल्याने कुणीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करू शकतो,असेही ते म्हणाले.
भाजपमधून उमेदवारी सुरुवातीला नको, असे म्हणायचे. परंतु आता केंद्रात आणि राज्यात पक्ष बळकट झालेला आहे. आता कोणालाही त्याची फळे चाखायला हवीत, असा उपरोधिक टोला लगावत नाईक म्हणाले, ज्यांनी-ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत, त्यांनी पक्षाचा वटवृक्ष केला आहे. तिसवाडीतील तीन आमदार कार्यक्रमाला उपस्थित होते, कारण पक्षात शिस्त आल्याचे हे द्योतक आहे,असे दामू नाईक यांनी नमूद केले. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या अनुपस्थितीवर मोन्सेरात यांनी ते गोव्याबाहेर असल्याचे आपणास सांगितल्याचे नाईक यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.