डिचोली, विश्वमानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच देशाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेबांनी चौफेर क्षेत्रात योगदान देत देशाला बलवान बनवले. त्यांनी साकारलेल्या संविधानामुळेच देश सुरक्षित आहे, असे मत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले. आजच्या युवा पिढीने डॉ. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शहरातील हरिजनवाडा-बोड्डे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कार्यक्रमात डॉ. चंद्रकांत शेट्ये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. राष्ट्रोळी युवा, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमास खास अतिथी म्हणून माजी सभापती राजेश पाटणेकर उपस्थित होते. अन्य मान्यवरांत नगरसेविका सुखदा तेली, माजी नगरसेवक नारायण बेतकीकर, स्मारक समितीचे गोविंद परवार, राजू परवार, निवृत्त शिक्षक दीनानाथ तारी आदींचा समावेश होता.
प्रारंभी डॉ. चंद्रकांत शेट्ये, राजेश पाटणेकर आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. सूत्रसंचालन करून राजू परवार यांनी आभार मानले.
आंबेडकरांचे कार्य संपूर्ण देशासाठी !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ दलित समाजापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण देशासाठी स्वतंत्रता, समता, आणि बंधुभाव या त्रिसूत्रीव्दारे सर्वांना प्रेरणा देणारे आहे, असे मत माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केले. आजच्या युवा पिढीने डॉ आंबेडकर यांच्यापासून आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.