हरमल: गोव्यातील भाजप सरकारने जमीन रूपांतरणाबाबतीत पेडणे तालुक्याला लक्ष्य केले आहे. पेडणे तालुका बेचिराख करण्याचे काम करू नये. भटवाडी हरमलचे जमीन रूपांतरण रद्द न झाल्यास येत्या विधानसभा अधिवेशनात, सचिवालयावर धडक मोर्चा नेऊ, असा इशारा गावच्यावतीने किशोर नाईक गावकर यांनी रविवारी दिला.
श्री रवळनाथ मंदिराकडून मशाल मिरवणूक घोषणा देत सुरू झाली. या मिरवणुकीत सुमारे ८०० स्त्री पुरुष सहभागी झाले होते. मांद्रे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
सार्वजनिक गणेशोत्सव सभागृहात भव्य उपस्थितीत पर्यावरण बचाव समिती आयोजित ‘हरमल वाचवा गोवा वाचवा’ मशाल मिरवणुकीनंतर झालेल्या भव्य उपस्थितीत घोषणा केली. तेरेखोल सारख्या गावातील लोकांनी गावच्या रक्षणासाठी धडक मोर्चा दिला होता. पारंपरिक रापोणकर लोकांना आवश्यक सोयी सुविधा न देता, त्यांचे इव्हेंट करा व गोवावासीयांना पेजेला लावा, असे उदगार नाईक गावकर यांनी काढले.
महिलांकडे राजकारण आहे, महिलांनी न डगमगता पुढे यावे. सेल्फ हेल्प ग्रुप व अन्य गोष्टी सरकार मॅनेज करतात. त्यामुळे हरमलवासीयांनी भविष्यासाठी जागे व्हावे, ह्या मशालीचे वणव्यात रूपांतर करून सरकारची राख रांगोळी झाली पाहिजे, असेही नाईक गावकर म्हणाले.
वास्तविक लोकप्रतिनिधी जीत आरोलकर तुमच्यासोबत आहेत, मात्र आज उपस्थित नाहीत. तसेच माजी आमदार दयानंद सोपटे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच गावचे सरपंच,पंच का नाहीत. जनतेची मते पाहिजे असल्यास त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्यावरील संकट दूर करण्याची गरज असताना, ते का उपस्थित राहिले नाहीत. त्यांना जाब विचारला पाहिजे, असेही नाईक गावकर यांनी आवाहन केले.
काँग्रेसमधील भ्रष्टांना घेऊन भाजपने सरकार घडवले व भ्रष्ट कारभार चालू केला आहे. भाजपच्या पाठीशी राहिल्यास, खड्ड्यात जाल, असे उदगार स्वप्नेश शेर्लेकर यांनी काढले. राजकीय मतभेद विसरून, एकत्र राहून हा लढा चालू ठेवला पाहिजे,असे मत दीपक कलंगुटकर यांनी व्यक्त केले.
यावेळी तनोज अडवलपालकर, संजय बर्डे, प्रसाद शेटगांवकर ,ॲड प्रसाद शहापूरकर , इनसिओ डिसोझा आदींची भाषणे झाली. मंचावर हरमल जिल्हा पंचायत सदस्य राधिका पालयेकर,पंच दिव्या गडेकर, काँग्रेसचे नारायण रेडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले. विजय नाईक यांनी आभार मानले.
विधानसभेत २०२४ साली ‘१७ ए व नंतर ३९ ए’ हा कायदा संमत केला, तेव्हाचे सगळे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. मोरजी पठारावर जेव्हा बेकायदा रस्ता मांद्रे हद्दीतून नेला होता,त्यावेळी सरपंच म्हणून आपण विरोध केला. त्यानंतर आपल्यावर अविश्वास ठराव आणला.अनेक दबाव आले,त्यासाठी हा लढा तीव्रपणे चालू ठेवणे अत्यावश्यक आहे.
-प्रशांत नाईक,पंचायत सदस्य
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.