बार्देश: तालुक्यातील लोकांसाठी पेयजल सुरक्षितता सुनिश्चित करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे पेयजल समस्या तीव्र होत चालली असून वेळीच उपाययोजना ना आखल्यास भविष्यात ही समस्या अधिक बिकट होणार आहे, असे महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी सांगितले.
खलप म्हणाल्या की, भाजप सरकारने म्हादईप्रश्नी कायदेशीर लढाईसाठी जनतेचे कोट्यवधी पैसे खर्च केले, मात्र दिलासादायक कोणतेही निकाल दिसले नाहीत. खरे तर याच सरकारने कर्नाटकला म्हादईचे पाणी वापरण्यास संमती दिली होती. तसेच तिळारीचे पाणी अद्याप कळंगुट आणि शिवोलीपर्यंत का पोहोचले नाही, याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे.
खलप पुढे म्हणाल्या की, पाणी पुरवठ्याची व्यवस्थाही पूर्णपणे कमकुवत झाली आहे. वारंवार जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत. यामागे भ्रष्टाचार असल्याचा दावा त्यांनी केला.
अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येशी महिलांना जास्त संघर्ष करावा लागतो. कर आणि बिल भरल्यानंतरही पाण्याची गरजा पूर्ण करण्यासाठी टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागते. सरकार मात्र टँकर माफियांशी हातमिळवणी करत आहे. असा आरोप डॉ. खलप यांनी केला.
म्हापसा हाउसिंगबोर्ड येथील समाजसेवक उल्हास भिवशेट यांनी सांगितले की, म्हापसा पालिका क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटून पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याचे दिसून येत आहे. याकडे पाणी पुरवठा विभागातील अभियंते, कर्मचाऱ्यांचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. एकतानगर भागात फुटलेली जलवाहिनी चार महिन्यानंतर दुरुस्त करण्यात आली, यावरून हा विभाग किती दक्ष आहे हे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.