पणजी: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांच्यात विरोधी आमदारांच्या बैठकीच्या संदेशावरून किंवा निमंत्रणावरून जे काही शाब्दिक वाद सुरू आहेत, त्यावरून या घडलेल्या घटना आघाडीसाठी हितावह नाहीत आणि संदेशांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे गोव्याच्या हिताचे नाही, असे मत माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले.
पाटकर यांनी सायंकाळी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सोमवारी दोन्ही नेत्यांकडून जे दर्शन घडले, त्या कृतींमुळे लोकांमध्ये अविश्वास निर्माण होतो आणि जनतेचा विश्वास कमी होतो. आघाडी कायम ठेवायची नसेल, तर तसे स्पष्टपणे सांगायला हवे.
तसेच, आपल्या कार्यकाळात आपण काँग्रेस पक्ष बळकट केला आणि इतर पक्षांतील नेत्यांना पक्षात सामील होण्यासाठी आत्मविश्वास दिला, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून दिली.
वरिष्ठांकडून प्रतिसादाची प्रतीक्षा!
गोवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून २९ मे रोजी आपणास तात्काळ प्रभावाने हटवण्यात आल्यानंतर, आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा म्हणून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिले होते. आपल्या कोणत्याही विनंतीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याने आपण अजूनही त्यांच्याकडील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत, असे त्यांनी नमूद केले.
ही कारवाई चुकीची!
मनीषा उसगावकर आणि शमिला सिद्दीकी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय चुकीचा होता. या दोघींनी गेल्या साडेचार वर्षांपासून काँग्रेससाठी काम केले होते आणि भाजप-आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध सातत्याने लढा दिला होता. या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजपच्या विरोधात बोलणे हेच आता हकालपट्टीचे कारण ठरले आहे का, असा सवाल पाटकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.