डिचोली: लामगाव-डिचोली येथील युवक अक्षत नाईक यांच्या विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यूप्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सत्य माहिती लपविण्यात आली असून निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप अक्षतचे वडील राजेश नाईक, आई, बहीण आणि कुटुंबीयांनी केला आहे. या संपूर्ण घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजेश नाईक यांनी सांगितले की, अक्षतला वेळेत रुग्णालयात नेले असते, तर त्याचा जीव वाचला असता. मात्र, घटनेतील अनेक बाबी संशयास्पद असल्याचा दावा करत त्यांनी म्हावळींगे येथील संबंधित घरमालक, वीज जोडणीचे काम करणारे वीज खात्याचे लाईनमन केदार मांद्रेकर आणि इतर संबंधितांची चौकशी करून घटनास्थळाचा फेरपंचनामा करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, २६ जून रोजी म्हावळींगे येथे विजेचा धक्का लागून अक्षतचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणातील सत्य समोर आल्याशिवाय मुलाच्या आत्म्यास शांती मिळणार नाही, अशी भावना राजेश नाईक यांनी व्यक्त केली.
शवचिकित्सा अहवालावरून प्रश्नचिन्ह
राजेश नाईक यांच्या म्हणण्यानुसार, शवचिकित्सा अहवालात अक्षतचा मृत्यू रात्री नऊ वाजण्यापूर्वी झाल्याचे नमूद आहे. मात्र, त्यानंतर मिळालेल्या फोनवरील माहितीमध्ये विसंगती असल्याचा दावा वडिलांनी केला आहे. अक्षतला ‘फिट’ येत असल्याचा दावा करण्यात आला, मात्र त्याला किंवा कुटुंबातील कोणालाही असा आजार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घटनेच्या वेळी संबंधित घरात वायरिंगचे काम कोण करत होते, ते काम करण्यासाठी आवश्यक परवाना होता का, तसेच वीज खात्यातील लाईनमनला खासगी वीज जोडणीचे काम करण्याची परवानगी कोणी दिली, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामाही केलेला आहे. अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
‘तो गेला... पण परत आलाच नाही’
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, केदार मांद्रेकर यांच्या बोलावण्यानंतर अक्षत शुक्रवारी म्हावळींगे येथे एका घरात वायरिंगचे काम करण्यासाठी गेला होता. घरातून निघताना त्याने ‘येतो’ असे आईला सांगितले होते; मात्र तो पुन्हा परतलाच नाही. राजेश नाईक यांनी सांगितले की, सायंकाळी ७.५२ वाजता केदार मांद्रेकर यांनी फोन करून अक्षतला घरी यायला उशीर होईल, असे सांगितले. त्यानंतर रात्री ९.३५ वाजता पुन्हा फोन करून अक्षतला ‘फिट’ आली असून तो हालचाल करीत नाही, अशी माहिती दिली.
त्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता अक्षत बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. १०८ रुग्णवाहिकेतून त्याला डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फोनवरून देण्यात आलेली माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामध्ये विसंगती असल्याचा दावा करत या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.