पणजी: भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर दिलेल्या वचनाप्रमाणे जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविले, तसेच श्रीरामाचे मंदिर उभारले. त्यामुळे देशात रामराज्य आलेच आहे, असे म्हणावे लागेल. भाजपच्या काळात ज्या गतीने विकास होत आहे तो पाहता सुराज्यही येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.
भाजपच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त रविवारी पक्षाच्या पणजीतील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रथम मुख्यमंत्र्यांनी कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार श्रीपाद नाईक, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आमदार राजेश फळदेसाई आणि मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.
सावंत म्हणाले, अवघे दोन खासदार असलेल्या पक्षाने कार्यकर्त्यांच्या बळावर जगातील सर्वांत मोठा पक्ष बनण्याची गरूड झेप घेतली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्र सर्वतोपरी’ ही भावना ठेवून काम केले. त्यामुळे मागील दहा वर्षांत देश विकासाच्या मार्गावर पोहोचला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ब्रीदवाक्य भाजपचे कार्यकर्ते विसरलेले नाहीत. अखंड भारताचे स्वप्न साकारण्यासाठीच आम्ही राजकारण करतो.
१९५१ साली त्यांनी जनसंघाची स्थापना केली आणि पुढे जनसंघातून भाजप या पक्षाची निर्मिती झाली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने विकासाचे स्वप्न पाहिले. २०४७ मध्ये देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देश जगातील सर्वांत विकसित देश असेल, हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर करणार आहे. केंद्रातील भाजपचे सरकार आल्यानंतर देशातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली गेली आणि पूर्ण होत आहेत. पुढील पिढीसाठी भाजपचे काय योगदान आहे, हे कळण्यासाठी कदंब पठारावर पक्ष कार्यालयाची उभारणी सुरू केली आहे.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, की राज्यात भाजप जो भक्कमपणे उभा आहे, त्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. दादा आर्लेकर, दत्ता भिकाजी नाईक, बखले अशा अनेकजणांनी पक्ष संघटना बांधणीसाठी कष्ट घेतले. असंख्य कार्यकर्त्यांच्या योगदानामुळेच मी अध्यक्षपदापर्यंत पोहोचलो. पक्ष जो मजबूतपणे उभा आहे, तो कार्यकर्त्यांच्या बळावरच. त्यामुळे पक्षासाठी झटणाऱ्या किंवा झटलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला विसरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार नाईक म्हणाले, देशात सर्वांत जास्त सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाने केवळ स्वहित आणि एकाच कुटुंबासाठी काम केले. निवडणुका आल्यानंतर केवळ सत्तेवर कसे येऊ, हेच त्यांनी पाहिले. देशाचे हित त्यांनी कधीच पाहिले नाही. गेल्या ११ वर्षांत भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली देशाची जी प्रगती झाली, ती आपण सर्वजण पाहत आहोत. भाजप हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. बहुमत असूनही इतर मित्र पक्षांनाही घेऊन भाजप सरकार चालवित असल्याचे त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.