Jasprit Bumrah & Rishabh Pant Apologized: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट मालिका नेहमीच चुरशीची आणि आक्रमकतेने भरलेली असते. नुकत्याच संपलेल्या भारत दौऱ्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा याने आता एका खळबळजनक प्रकरणावरुन पडदा उचलला आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंकडून झालेल्या एका टिप्पणीवर बावुमाने भाष्य केले असून जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांनी याप्रकरणी आपली माफी मागितल्याचे त्याने स्पष्ट केले.
ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले होते. बावुमाच्या म्हणण्यानुसार, मैदानावर भारतीय खेळाडूंनी त्यांच्या भाषेत (हिंदीत) त्याच्या शरीरयष्टीवरुन 'बौना' (बुटका) अशी टिप्पणी केली होती. याविषयी बोलताना बावुमाने 'ESPNCricinfo' साठी लिहिलेल्या आपल्या कॉलममध्ये म्हटले की, "मैदानावर एक घटना घडली, जिथे भारतीय खेळाडूंनी त्यांच्या भाषेत माझ्याशी संबंधित काहीतरी म्हटले. मात्र, दिवसाच्या शेवटी भारताचे (India) दोन वरिष्ठ खेळाडू जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत माझ्याकडे आले आणि त्यांनी त्या घटनेबद्दल माफी मागितली."
बावुमाने पुढे असेही सांगितले की, ज्यावेळी त्यांनी माफी मागितली, त्यावेळी त्याला नेमका प्रकार काय घडला होता हे माहित नव्हते. "त्यांनी माफी मागितली तेव्हा मला कल्पना नव्हती की त्यांनी नक्की काय म्हटले होते. मी ते ऐकले नव्हते, त्यामुळे मला आमच्या मीडिया मॅनेजरकडून त्याबद्दल माहिती घ्यावी लागली. मैदानावर जे घडते ते तिथेच राहते, पण तिथे काय बोलले गेले हे तुम्ही विसरत नाही. मी अशा गोष्टींचा वापर स्वतःला अधिक प्रेरित (Motivation) करण्यासाठी करतो. माझ्या मनात कोणाबद्दलही वैयक्तिक तक्रार किंवा राग नाही," असे बावुमाने स्पष्ट केले.
टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने (South Afirca) या दौऱ्यात कसोटी मालिकेत भारताचा 2-0 असा धुव्वा उडवला. भारताला त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत करणे ही दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी उपलब्धी ठरली. मात्र, वनडे मालिकेत भारताने कमबॅक करत मालिका 2-1 ने जिंकली आणि टी-20 मालिकेतही भारतीय संघाने 3-1 अशा फरकाने वर्चस्व राखले. बावुमाने मान्य केले की कसोटी मालिका अत्यंत स्पर्धात्मक होती आणि खेळाडूंमध्ये विजयाची प्रचंड जिद्द होती.
या दौऱ्यात केवळ खेळाडूच नाही तर प्रशिक्षकही चर्चेत राहिले. दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनरॅड यांनी एका पत्रकार परिषदेत 'ग्रोवेल' (लोळण घेणे किंवा लाचारी पत्करणे) या शब्दाचा वापर केला होता, ज्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. यावर बावुमा म्हणाला, "शुक्रींनी कदाचित तो शब्द वापरायला नको होता. मीडियाने माझ्यावर त्या कमेंट्सबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा मी पहिल्यांदा ते ऐकले, तेव्हा मलाही ते आवडले नाही. पण त्यावरुन ही कसोटी मालिका किती कठीण आणि स्पर्धात्मक होती याची जाणीव झाली. नंतर शुक्री यांनी स्वतः मान्य केले की ते अधिक चांगला शब्द निवडू शकले असते आणि मी त्यांच्याशी सहमत आहे."
बावुमाच्या या स्पष्टीकरणानंतर आता क्रीडा विश्वात चर्चा सुरु झाली असून भारतीय खेळाडूंचे खिलाडूवृत्ती दाखवून माफी मागणे हे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, बावुमाने ज्या प्रकारे या घटनेला सकारात्मक ऊर्जेत बदलले, त्याचेही कौतुक होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.