Manish Jadhav
भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जात आहे.
पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा जलवा पाहायला मिळाला. त्याने एकट्याने इंग्लंडच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
बुमराहने 24.4 षटकांत 83 धावांत 5 बळी घेतले. या कामगिरीसह त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 14व्यांदा 5 बळी घेण्याचा रेकॉर्ड केला.
बुमराहने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या एका डावात 5 बळी घेण्याची महान कामगिरी तिसऱ्यांदा केली. यासह तो इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला.
बुमराहने ही महान कामगिरी करुन 9 भारतीय गोलंदाजांना मागे सोडले. बुमराहच्या आधी इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या एका डावात दोनदा 5 बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये लाला अमरनाथ, बीएस चंद्रशेखर, कपिल देव, भुवनेश्वर कुमार, विनू मंकड, मोहम्मद निस्सार, चेतन शर्मा, इशांत शर्मा आणि सुरेंद्र नाथ यांचा समावेश आहे.
तसेच, बुमराह हा SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 150 बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला.
SENA देशांमध्ये केवळ 3 गोलंदाज 150 किंवा त्याहून अधिक बळी घेऊ शकले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजमधील 2 दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे.
कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज) - 213, कर्टली अॅम्ब्रोस (वेस्ट इंडीज): 184 जसप्रीत बुमराह (भारत): 150, मॅल्कम मार्शल (वेस्ट इंडीज): 148, वसीम अक्रम (पाकिस्तान): 146, अनिल कुंबळे (भारत): 141