मुंबई: मायदेशात होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी उद्या भारतीय संघाची निवड जाहीर केली जाणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असलेल्या संघ कायम राहण्याची शक्यता आहे, पण संघ जाहीर होत असताना कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांचा हरपलेला सूर चिंता करणारा ठरणार आहे.
हा संघ उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेतून जाहीर केला जाणार आहे. त्यासासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित राहणार आहेत. उद्या संघ जाहीर करण्यात आला तरी ७ फेब्रुवारी रोजी स्पर्धा सुरू होण्यापर्यंत ऐनवेळी संघात बदल करण्याची मुभा बीसीसीआयला असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असाच अचानक बदल करण्यात आला होता. मूळ संघात यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली होती, परंतु दुबईतील खेळपट्ट्या फिरकीस अधिक सहाय्य करतील हा अंदाज बांधून ऐनवेळी जयस्वालऐवजी वरुण चक्रवर्तीची निवड करण्यात आली होती. कर्णधार असलेल्या सूर्यकुमारसाठी ही अखेरची जागतिक स्पर्धा असेल हे बीसीसीआयमधील कोणी नाकारत नाहीये.
आत्ता त्याचे वय ३५ वर्ष असून, तो वर्षभरापासून त्याचा फॉर्म हरपलेला आहे. गेल्या १४ महिन्यांत मिळून सूर्यकुमार २४ सामने खेळला आहे. केवळ कर्णधार असल्यामुळे तो संघातले स्थान कायम ठेवून आहे, असे बोलले जात आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती टी-२० विश्वकरंडक स्पर्धेअगोदर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठीही संघ निवडणार आहे, मात्र विश्वकरंडक स्पर्धेचाच संघ कायम असेल.
संभाव्य संघ ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.