Pakistan U19 Asia Cup 2025 Winner: दुबईच्या आयसीसी अकादमी मैदानावर रंगलेल्या अंडर-19 आशिया चषक 2025 च्या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा अक्षरशः धुव्वा उडवला. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताचा 191 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत आशियाई चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. 348 धावांच्या डोंगराएवढ्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि संपूर्ण संघ अवघ्या 156 धावांत गारद झाला. या पराभवामुळे भारताचे नवव्यांदा आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय पूर्णपणे अंगाशी आला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. हमजा जहूर 18 धावांवर बाद झाला, तरी दुसऱ्या बाजूने समीर मिन्हासने भारतीय गोलंदाजांचे कंबरडे मोडले. समीरने अवघ्या 113 चेंडूंमध्ये 172 धावांची झंझावाती खेळी खेळली. त्याच्या या खेळीत 17 चौकार आणि 9 गगनभेदी षटकारांचा समावेश होता.
समीरला उस्मान खान (35) आणि अहमद हुसैन (56) यांनी मोलाची साथ दिली. मधल्या फळीतील इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही, तरीही पाकिस्तानने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 347 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून दीपेश देवेंद्रेन याने 3 बळी घेतले, तर हेनिल पटेल आणि खिलान पटेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. मात्र, भारतीय गोलंदाजांना धावांची गती रोखण्यात पूर्णपणे अपयश आले.
348 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. कर्णधार आयुष म्हात्रे अवघ्या 2 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला, ज्यामुळे संघावर सुरुवातीलाच दडपण आले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 26 धावा करत काही काळ प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो मोठी खेळी खेळू शकला नाही. ॲरोन जॉर्ज (16) यानेही निराशा केली.
विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कूंडु यांसारखे महत्त्वाचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. संपूर्ण भारतीय संघ 38.4 षटकांत 156 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानसाठी अली रझाने घातक गोलंदाजी करत 4 बळी टिपले. त्याला मोहम्मद सैयाम, हुझैफा एहसान आणि अब्दुल सुभान यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेत चांगली साथ दिली.
अंडर-19 स्तरावर पाकिस्तानने दाखवलेली ही कामगिरी त्यांच्या भविष्यातील क्रिकेटसाठी आश्वासक ठरणारी आहे. विशेषतः अंतिम सामन्यात भारतासारख्या बलाढ्य संघाला इतक्या मोठ्या फरकाने हरवणे, हा त्यांच्यासाठी मोठा विजय आहे. भारतासाठी हा पराभव मोठा धक्का असून, फलंदाजीतील अपयश आणि गोलंदाजीतील शिस्तबद्धतेचा अभाव यावर आता संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.