मोहन नरसिंह महाले
तळावली गाव फोंडा तालुक्यातील दुर्भाट आणि कपिलेश्वरी गावाच्या मधोमध आमच्या गावाला येण्यासाठी तुम्हाला दोन-तीन वाटा आहेत. बोरीतून तुम्ही येऊ शकता, फोंडयाहून अन् कुठ्ठाळीहून फेरीतून पलिकडे दुर्भाटला उतरून आरामात आमच्या गावात येऊ शकता.
तळावली गावचे भूषण प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी, ज्यांच्या नावाने या गावाचे नावही प्रसिध्दीस आले. ज्याचे ‘ताठ कणा’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असेच आहे. कारण प्रत्येकाला काही आपल्या शरीरातील व्याधींबाबत, किंवा शरीराचे प्राथमिक ज्ञान असत नाही. या पुस्तकातून देवाने दिलेल्या शरीराची किंमत कळून येते. डॉ. रामाणींमुळे त्यांच्या जन्मगावाची प्रसिद्धी सर्वदूर झाली.
तळावली गाव आमचं लहान, पण सतत हिरवेगार. कारण वाहत्या पाण्याचे लहान लहान ओहळ गावात अनेक ठिकाणी आहेत. ज्यांनी आमच्या गावातील शेती, बागायती जिवंत ठेवल्या. पूर्वी गावात शेती भरपूर अन् शेती करणारेही भरपूर होते. पण आता नव्या पिढीला शिक्षणामुळे अनेक क्षेत्रात जाता आले, त्यामुळे नव्या पिढीने परंपरागत धंद्याकडे पाठ फिरवली. वाहत्या काळाचे हे बदलते रुप आहे.
फोंड्याहून दुर्भाटकडे जाताना तुम्हाला तळावली गावचा बोर्ड दिसेल. तेथून आत आलात की आमच्या गावाची सुरुवात. गाव छोटासा अन् शांत वृत्तीचा. तळावली गावाचे रक्षण करणारेही तीन देव. प्रथम गावची श्री महालक्ष्मी ती आमची ग्रामदेवता तिचा उत्सव हा साऱ्या गावचा उत्सव अन् दुसरा आमचा श्री गणपती अन् तिसरा वेताळ.
देवळांचे महाजन आमच्या गावात देवाची अन् आपल्या कुटुंबाची सेवा करतात. त्यामुळे दिवसभर कष्ट करून आल्यावर संध्याकाळी देवळाकडे जातात, दर्शन घेऊन येतात. गावात पूर्वी शेती होती, आता ती ओसाड स्थितीत पडून आहे. काहीजण शिंपण करून वांगी, भेंडी, घोसाळे, दोडकी अन् पालेभाज्यांचे पीक काढतात. थोडी वापरतात, जादा असेल तर ती दुर्भाट,- तळावलीच्या बाजारात वा फोंडा बाकारात विकून येतात. गावात त्याशिवाय पूर्वीची कुळागरे आहेत, त्यात माडा, सुपारी, पानवेली, मिरी यासारखी हंगामी पिके काढतात.
आमच्या गावात कलाकरांची कमी नाही, तर श्री पूर्वी गणेशमूर्ती करणारे, सरस्वती पूजनासाठी सरस्वतीच्या मूर्ती साकारणारे मूर्तिकार खूप. इथून तयार झालेल्या मूर्ती फोंडा, सासष्टी, केपे, शिरोडा, तिसवाडी तालुक्यांत जातात. पूर्वी तर शाडूच्या मूर्ती पूजेला लावत. आता प्रथा बदलत आहे. कलेपेक्षा आकर्षणाला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.
दुर्भाट नदीवरच्या फेरीबोटमुळे आमचा गाव संपूर्ण तालुक्याला जोडला गेला आहे. त्यामुळे येथील नवीन पिढीला नोकरीसाठी वेर्णा औद्योगिक वसाहतीत, मडगावमधील अनेक सरकारी कार्यालयांत नोकरीवर जाणे सहज शक्य झाले. पूर्वी या नदीवर येणे जाणे ‘पनळ’ होडी वरून होत असे. त्याकाळी गावची लोकसंख्याही कमी होती
गाव सोडून लांब जाणारे लोकही कमी. पूर्वी गावचे लोक लहानमोठ्या खरेदीसाठी ५-६ कि.मी. चालत फोंडा तालुक्याच्या ठिकाणी जात. या गावचे महत्व सर्व गोवेकरांना माहीत असेल की नाही कळत नाही, पण ज्याकाळी बाटाबाटी झाली, त्याकाळी याच नदीच्या तटावर सासष्टीतील देवळांतील देव घेऊन आमचे पूर्वज उत्तरले होते. येथून ते ते देव घेऊन म्हार्दोळला, वेलिंगला, मंगेशीला, फोंड्या तालुक्यातील विविध ठिकाणी गेलेत आणि तेथे नवीन देवळे स्थापन केली. कारण फोंडा तालुक्याचे संस्थानिक होते, सौंदेकर राजे. एकदा एक वयस्क मला सांगत होता की,
दुर्भाट, तळावली, आगापूर, ही गावे म्हणजे देवासाठी देवाने तयार केलेली बंदरे होती. स्थलांतरीत देवांचे पहिले पाऊल आमच्या गावाला लागले हेच आमचे भाग्य.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.