डॉ. नाऊ वरक
१९३६ मध्ये स्थापन झालेल्या ऑल-इंडिया स्टुडन्ट फेडरेशनने (एआयएसएफ) भारतीय शिक्षण प्रणाली ही भांडवलशाही विरोधात असावी यासाठी उच्च शिक्षण संस्थांवर दबाव आणला. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीतही देशातील १० टक्के विद्यार्थी सहभागी झाले.
नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर देशात काही विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्या. ‘नीट’ संबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुण आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना ‘झुरळांची’ उपमा दिली. यालाच प्रत्युत्तर म्हणून अभिजीत दिपके यांनी ‘कॉक्रोच जनता पक्ष’ (सीजेपी) स्थापन केला. दिपके ‘नीट’ पेपरफुटी विरोधातील चळवळीचे नेतृत्व करताहेत तर राहुल गांधी व्यापक विद्यार्थी चळवळ उभारत आहेत.
स्वातंत्र्यलढ्यात अग्रस्थानी असलेली विद्यार्थी चळवळ कमकुवत का झाली? शिक्षणक्षेत्रातील विज्ञान ‘श्रेष्ठ’ आणि सामाजिक विज्ञान ‘दुय्यम’ या वर्गवारीमुळे महाविद्यालये व विद्यापीठांतून चळवळ नामशेष होत आहे का? याचा विचार झाला पाहिजे. १८५७ साली बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता या तीन विद्यापीठांची स्थापना झाली. १८५७ ते १८८२ या काळात महाविद्यालयांची संख्या २७ वरून ७२ एवढी झाली. याच काळात नागरी सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि कायदा या तीन प्रमुख क्षेत्रांत उच्चभ्रू कुटुंबांनी आपली मक्तेदारी प्रस्थापित केली.
शिक्षण व्यवस्थेचा वाढता आवाका आणि राजकीय दृष्टिकोन असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील वाढीमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला क्रांतिकारी स्वरूप मिळाले. टिळक व लाला लजपत राय या जहालवादी नेत्यांमुळे तरुण विद्यार्थ्यांना काँग्रेसविषयी आकर्षण वाटू लागले. १९२० मध्ये गांधींजींच्या असहकार चळवळीत तरुण विद्यार्थ्यांचा भरणा वाढला. ठिकठिकाणी काँग्रेसने युथ लीग स्थापन केल्या. भगत सिंग यांनी १९२६ मध्ये लाहोर येथे नौजवान भारत सभा, तर १९२८ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया युथ लीग स्थापन केली. १९२० मध्ये नागपुरात पहिली ऑल इंडिया कॉलेज स्टुडंट्स कॉन्फरन्स भरली.
भारतभर होणाऱ्या विद्यार्थी परिषदांमुळे विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रवाद, समाजवाद आणि मार्क्सवाद हे वसाहतवादविरोधी विचार वाढीस लागले. विद्यार्थ्यांनी १९२८ मध्ये सायमन आयोगाचा तीव्र विरोध करत १९३० मध्ये गांधीजींच्या सविनय कायदेभंगात उत्स्फूर्त भाग घेतला. १९३६ मध्ये स्थापन झालेल्या ऑल-इंडिया स्टुडन्ट फेडेरेशनने (एआयएसएफ) भारतीय शिक्षण प्रणाली ही भांडवलशाही विरोधात असावी यासाठी उच्च शिक्षण संस्थांवर दबाव आणला. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीतही देशातील १० टक्के विद्यार्थी सहभागी झाले.
१९४५ मध्ये काँग्रेसने ‘स्टुडंट्स काँग्रेस’ स्थापन केली. सामाजिक विज्ञानाच्या यशामुळे विद्यार्थी चळवळ शक्य झाली.१९४७ नंतर क्रांतिकारी विद्यार्थी काँग्रेसकडून दूर जाऊ लागले. विज्ञानाला भरघोस निधी देऊन राजकीय तत्वज्ञानाचा शिक्षण संस्थांमधील प्रभाव कमी करण्यात आला. उच्चभ्रू विद्यार्थी विज्ञानाकडे केंद्रित झाले. श्रमिक वर्गातील विद्यार्थ्यांची सामाजिक विज्ञानातील पटसंख्या वाढली. श्रमिक वर्गातील विद्यार्थी सामाजिक विज्ञान शिकतात, त्याच्याकडे काय एवढे लक्ष द्यायचे! असा दृष्टिकोन शिक्षण संस्थामध्ये दृढ झाला. उच्च वर्गातील विद्यार्थी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेतात हा बुद्धिमत्तेचा विषय नसून ऐतिहासिक असमानतेचा मुद्दा आहे.
नीट परीक्षेतील त्रुटींमुळे विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना विद्यार्थी चळवळीचे राजकीय महत्व कळत आहे. ‘नीट’ परीक्षा देणारे बहुसंख्य विद्यार्थी उच्चभ्रू कुटुंबातील असल्यामुळे अशी देशव्यापी चळवळ दोन महिन्यात उभारता आली. सीजेपीच्या मागण्या या नुकसानभरपाई या तत्वावर आधारित असून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा सुचवत नाहीत. राहुल गांधी आपली ‘छात्रों की गूंज’ ही चळवळ सुधारणावादी असल्याचे सांगतात व परीक्षाव्यवस्थेतील नियमिततेबरोबरच ‘परवडणारे दर्जेदार शिक्षण’ देण्याची मागणी करतात.
जेएनयू, नवी दिल्ली येथील विद्यार्थी समाजात रचनात्मक बदल व्हावेत म्हणून चळवळी करतात. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया हि २३ वर्षीय फिजिओथेरपिस्ट तरुणी मुनिरका, नवी दिल्ली येथे सामूहिक बलात्कारास बळी पडली. घटनेची माहिती मिळताच जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी घटनेच्या स्थळी रास्तारोको करून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसयंत्रणेवर दबाव आणला. विद्यार्थी तिथेच थांबले नाहीत. सरकारवर दबाव आणण्यासाठी दोन दिवसातच इंडिया गेट येथे निषेध सभा बोलावली. इंडिया गेटकडून राजपथावरून घोषणा देत बॅरिकेड हटवत विद्यार्थी थेट केंद्रीय सचिवालय, रायसिना हिल मध्ये धडकले.
पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत विद्यार्थी तिथेच तळ ठोकून बसले. क्रांतिकारी गाणी म्हणत त्यांनी रात्र काढली. मात्र, दुसऱ्या दिवशी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील लोक राजपथावर जमू लागले. गर्दी लाखोंच्यावर गेली. अश्रूधूर, वॉटर कॅनन आणि रबर बुलेटच्या माऱ्याने राजपथ गजबजून गेला. जेएनयूचे विद्यार्थी आ वासून बघत होते. आंदोलन भरकटले होते.
अशा रीतीने आंदोलनाचा सामाजिक आराखडा घेऊन आलेले जेएनयूचे विद्यार्थी ६०४ नंबरच्या बसने हतबल होऊन कॅम्पसकडे रवाना होत होते. ‘मै भी अण्णा, तू भी अण्णा!’ या घोषणा आंदोलनात कोण तरी भला मोठा ‘लिव्हायथन’ उभा होता याचा भास करून देत होत्या. गेल्या काही वर्षांत योजनाबद्ध चळवळी आढळत नाहीत. उच्चभ्रू किंवा मध्यम वर्गाला इजा झाल्यावरच लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना ‘लढो पढाई करने को, पढो समाज बदलने को! या जेएनयूतील घोषणेची कास धरावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.