गोव्याचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर त्याच्या संस्कृतीचा, नियमांचा आणि स्थानिकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. जबाबदार पर्यटन ही काळाची गरज आहे.
‘अतिथी देवो भव’ ही आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. पाहुण्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य ही आपली परंपरा आहे. गोवा हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून, समृद्ध संस्कृती, मोकळेपणा आणि आपुलकीसाठी ओळखले जाणारे राज्य आहे. आकाराने छोटे असले तरी गोमंतकीयांची मने मोठी आहेत आणि पाहुणचारात ते कधीही कमी पडत नाहीत.
दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांत घालवण्यासाठी देश-विदेशातील अनेक पर्यटक गोव्याची निवड करतात. शांतता, समुद्रकिनारे आणि निसर्ग यामुळे गोवा त्यांना आकर्षित करतो. काही पर्यटक येथे येऊन स्थानिक संस्कृती समजून घेतात, लोकांमध्ये मिसळतात आणि ‘खरा गोवा’ अनुभवतात. मात्र, काहींसाठी गोवा म्हणजे फक्त पार्टी, मद्यपान, बेफिकीर वाहन चालवणे आणि गोंधळ घालणे एवढ्यापुरताच मर्यादित राहतो.
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे गोव्याबद्दल विविध व्हिडिओ आणि रील्स व्हायरल होत आहेत. अनेकदा यात राज्याचे नकारात्मक चित्र उभे केले जाते. काही पर्यटकांच्या मते गोवा महागडा आहे, सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत, फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीवर बंधने आहेत, तसेच स्थानिकांकडून त्रास होतो. ओला-उबरसारख्या सेवांचा अभावही वारंवार चर्चेत येतो. पण याचवेळी एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो; त्रास फक्त पर्यटकांनाच होतो का? स्थानिकांना होत नाही का? सध्याच्या परिस्थितीकडे बारकाईने पाहिले तर अनेक गोमंतकीय पर्यटकांच्या काही वर्तनामुळे त्रस्त झालेले दिसतात. गोव्याची शांतता, सांस्कृतिक मूल्ये आणि जीवनशैली काही पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे बाधित होत आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, मोठ्या आवाजात गोंधळ करणे हे प्रकार वाढले आहेत.
अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात काही रहिवाशांनी त्यांच्या घराजवळ फोटो काढणाऱ्या पर्यटकांवर पाणी टाकल्याचे दिसते. यावर टीका झाली, परंतु त्या ठिकाणी ‘नो फोटोग्राफी’चे फलक आधीपासून लावलेले होते. त्या परिसरात ज्येष्ठ नागरिक राहतात, ज्यांना शांततेची गरज असते. तरीही काही पर्यटक तिथे येऊन मोठ्याने ओरडणे, नाचणे आणि रील्स तयार करणे सुरू ठेवतात. परिणामी स्थानिकांचा त्रास वाढतो. ही परिस्थिती इतकी गंभीर होत आहे की काही गोमंतकीयांना स्वतःच्या घराबाहेरही शांतपणे वावरणे कठीण होत आहे. काहींच्या चुकीच्या वर्तनामुळे सर्व पर्यटकांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होण्याचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, गोवेकर इतर राज्यांत जाऊन अशा प्रकारचे वर्तन करताना क्वचितच दिसतात. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. पर्यटनाचा खरा अर्थ केवळ मजा करणे नाही, तर त्या ठिकाणच्या संस्कृतीचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
गोव्यातली शांतता, औदार्य, पाहुणचार करण्याची गोव्याची पद्धत यांचा अभ्यास पर्यटकांनी केल्यास त्यांच्याही जीवनात त्याचा चांगला सकारात्मक परिणाम होईल. उलट ‘आम्ही पर्यटक आहोत, आम्ही वाट्टेल तसे वागू. तुम्ही यजमान आहात, तुम्ही आम्हाला सहन केले पाहिजे’ हा ऍटिट्यूड ठेवल्यास काहीच साध्य होणार नाही. उच्च विद्याविभूषित, बाहेरच्या देशांमध्ये पर्यटन करणारे लोक अगदी आग्रहाने ‘व्हेन इन रोम, डू ऍज रोमन्स डू’(रोममध्ये जात असाल तर रोमन जसे वागतात, तसेच वागा), असे म्हणताना दिसतात. तीच जाणीव, तेच सौजन्य गोव्यात येताना का बरे विसरतात? गोव्याचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर त्याच्या संस्कृतीचा, नियमांचा आणि स्थानिकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे.
जबाबदार पर्यटन ही काळाची गरज आहे. शेवटी, प्रश्न तसाच राहतो; त्रास फक्त पर्यटकांनाच होतो का, की गोमंतकीयांनाही? आदरातिथ्य हा ज्यांच्या संस्कृतीचा, रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, त्यांना पाहुणे आलेले नको कसे बरे होतील? अतिथी आलेलेच हवे आहेत, फक्त ते अतिथी आततायी होणे गोमंतकीयास सहन होत नाही. म्हणूनच ‘त्रास कुणाला होतो?’ याचे उत्तर शोधताना दोन्ही बाजूंचा विचार करणे आणि जबाबदार पर्यटनाची गरज ओळखणे आज अधिक महत्त्वाचे ठरते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.