पणजीत निर्माण झालेले ‘स्पा’ आपल्याला माहीत नाहीत अशा आविर्भावात वावरणारे येथील आमदार, स्मार्ट सिटीच्या प्रश्नावरही अनभिज्ञ होते. याला ‘जबाबदारी’ म्हणायचे काय?
पणजी राजधानीत निर्माण झालेला ‘स्पां’चा सुळसुळाट निश्चितच नागरिकांच्या मनात चिंता उत्पन्न करतो, परंतु त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला स्थानिक आमदार व मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ज्या बेदरकारीने उत्तर दिले, त्यामुळे ही चिंता आणखीनच वाढेल. हे ‘स्पा’ माझे आहेत काय? असा उलट सवाल करीत मंत्र्यांनी नागरिकांची व्यथा नेमक्या शब्दात मांडणाऱ्या वृत्तप्रतिनिधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला.
पणजीतील नागरिक आधीच बोलत नाहीत. येथे स्मार्ट सिटीपासून अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ते नागरिकांच्या जिवावरही उठले आहेत. याच समस्यांनी त्रस्त होऊनही अनेक दडपणांमुळे लोक तोंड उघडायला घाबरतात. अशावेळी पत्रकार व समाजमाध्यमेच लोकांच्या व्यथा नेमकेपणाने मांडत असतात. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देणे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभत नाही!
पणजीला गेल्या काही वर्षांत कॅसिनोंनी अक्षरशः वेढले आहे. देशभर या सुंदर राजधानीला ‘जुगारा’मुळे ओळखले जात असतानाच आता रंगेल पर्यटकांसाठी ‘स्पा’च्या नावाखाली थायलंडसारखेच स्वरूप आणून दिले आहे. पणजीत आजच ३० वर ‘स्पा’ असून १८ जून मार्गावरच त्यांची संख्या ६-८च्या वर आहे. त्यात सतत भर पडत चालली आहे.
वर वर दिसायला ते जरी शास्त्रशुद्ध नितळ ‘मसाज’ पार्लर वाटत असले तरी तेथे अनैतिक कारभार मांडला जातो व त्यासाठी इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर मुली आणल्या जात असल्याचे लपून राहत नाही. अशा ‘स्पा’मध्ये अनेक बेकायदा गोष्टी बिनदिक्कत चालू आहेत! मुलींना फसवणूक करून आणले जाते. त्यांची पिळवणूक होते. त्या आजाराने पीडित आहेत का, याची खबरदारी घेतली जात नाही. त्या अनेक दुर्धर आजार पसरवू शकतात.
शिवाय तेथे येणाऱ्या गिऱ्हाईकांची फसवणूक होण्याचीही शक्यता असते. गोव्याच्या किनारपट्टीवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या ‘मसाज पार्लर’मध्ये गिऱ्हाईकांची फसवणूक होते, त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप आहेत. एका बाजूला अनैतिक कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन केंद्रांची सतत बदनामी होत असते व फसवणूक, पिळवणूक, विविध आजार यामुळे अशा केंद्रांना उतरती कळा लागलेली आपण पाहतो.
आपल्याला असा ‘बाजार’ मांडायचा आहे काय? महत्त्वाची गोष्ट आहे ती, पणजीत सुळसुळाट झालेल्या ‘स्पा’नी नियम पाळलेले आहेत काय? ज्याप्रमाणे आरोग्य खात्यातर्फे ‘कन्सल्टिंग रूम’ व इस्पितळांची तपासणी होते, तशीच तपासणी करून ‘स्पा’नाही प्रमाणपत्र द्यावे लागते. तशा मान्यता त्यांना मिळाल्या व त्यांची ठरावीक मुदतीने तपासणी केली जाते का?
‘हे स्पा काही माझे नाहीत, मला का विचारता?’ असा उलटा सवाल विचारणाऱ्या पणजीच्या आमदाराने, त्यांचे जर हे ‘स्पा’ त्यांचे नसतील, तर ते कोणाच्या मान्यतेने येथे निर्माण झाले व अजूनही हातपाय पसरवत आहेत, त्याचाही खुलासा केला तर बरे होईल. मोन्सेरात हे पणजीचे आमदार, मंत्री आहेत. सरकारने ‘स्पा’ना मान्यता दिली असेल, तर त्याची जबाबदारी मोन्सेरातना घ्यावीच लागेल.
त्यांना नको असतानाही ते पणजीत आणले जात आहेत काय, सरकारचा एखादा घटक, मंत्री त्यांची जोरजबरदस्तीने येथे स्थापना करतोय काय, मोन्सेरात यांच्या भूमिकेची पर्वा केली जात नाहीय काय? मोन्सेरात यांना विश्वासात न घेता येथे ‘स्पा’ आणले जात असतील तर तीही चिंतेचीच बाब आहे! शिवाय त्यांचे चिरंजीव हे पणजी राजधानीचे महापौरही आहेत.
या ‘स्पा’ना ज्या काही मान्यता, परवाने लागतात, त्यात महाकाय पालिकेचाही समावेश आहे. पालिकेच्या मान्यतेविना इतक्या मोठ्या संख्येने ‘स्पा’चे जाळे निर्माण होणेच शक्य नाही. पालिकेने त्यांना मान्यता दिलेली नसेल, तर पणजीमध्ये अशी मान्यता देणारी एखादी स्वतंत्र पर्यायी यंत्रणा कोणी उभारली आहे काय, याचाही त्यांनी खुलासा करावा.
पणजीत ‘स्मार्ट सिटी’ची कामे होत असताना आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार यापूर्वी मोन्सेरात पिता-पुत्र सतत करीत असतात. स्मार्ट सिटीसाठी एक वेगळे मंडळ स्थापन करण्यात आले होते, परंतु त्या मंडळावरही दोघे पिता-पुत्र होते. त्यांना अगदी अंधारात ठेवून ‘स्मार्ट सिटी’ उभारली गेली हे काही संभवत नाही. असाच प्रकार ‘स्पा’बाबतही घडत आहे काय? एकूण ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असाच काहीसा हा प्रकार आहे. या सरकारात कोण कसली जबाबदारीच घेताना दिसत नाहीत!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.