गोव्यात जो उठतो, तो नेहमीच स्थलांतरितांच्या नावे बोटे मोडताना दिसतो. पण स्थलांतरित वा परप्रांतीय यांची ही समस्या तयार का झाली, याचा विचार होताना दिसत नाही. परप्रांतीयांचे मोठे लोंढे प्रत्येक दिवशी येतात हे खरे. परराज्यांतील बसेस व रेल्वेगाड्या स्थानकावर येऊन थांबल्या, की अशा लोकांची रीघ हातांत वा खांद्यावर बॅगा घेऊन शहरांकडे वा गावांकडे चालताना दिसते व ही गोष्ट आजकालची नव्हे, तर गेल्या अनेक दशकांची आहे.
हे लोक येतात कुठून व जातात वा राहतात कुठे याची कोणतीच माहिती स्थानिकांना वा येथील यंत्रणेलाही नसते. त्यामुळे ही गोव्यासमोरची एक गंभीर समस्या होऊ लागलेली आहे व त्यामुळे परवा गोवा मंचाने राज्यपालांची भेट घेऊन ती चिंता त्यांचासमोर व्यक्त करणे वा अशा लोंढ्यामुळे गोमंतकीयांची घटत चाललेली लोकसंख्या, येथील कला व संस्कृती, खाद्यसंस्कृती येथील आदरातिथ्य यावर होऊ लागलेल्या परिणामांची कल्पना देणे व चर्चा करणे यात वावगे काहीच नाही.
कारण अशा सततच्या लोंढ्यांमुळे व त्यांच्या कायम वास्तव्यामुळे गोमंतकीयत्वच समाप्त होऊ लागले आहे, बदलू लागले आहे, यात तथ्य आहे. पण या एकंदर परिस्थितीला आपण गोवेकरच जबाबदार आहोत, हेही तेवढेच खरे आहे. आपण प्रत्येकाने ठरवले व पावले उचलली तरच या परिस्थितीवर आळा बसणे शक्य आहे. पण गेावा मुक्तीनंतरच्या साठ-पासष्ट वर्षांतील अनुभव पाहिला तर आपण आपली ‘सुशेगाद वृत्ती’ सोडायला तयार नाही व त्यांतूनच ही सगळी आव्हाने तयार झालेली आहेत.
आपल्याला स्वतः काही करायला नको, सगळे काही सरकारने करावे, हीच आपली अपेक्षा असते. तर काही जण विदेशात जाऊन बसलेले आहेत व तिथून सरकारने काय करावे हे सल्ले प्रत्यक्ष नव्हे तर समाजमाध्यमांवरून देतात. अशातून गोंयकारपण कसे टिकणार हा प्रश्न तयार होतो. नाही म्हणायला भाऊसाहेब व भाई पर्रीकर यांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत जे काही केले त्यामुळेच तर गोवा अजून थोडाफार शिल्लक आहे, असेच म्हणावे लागेल.
पण सरकारलाही दोष देऊन चालणार नाही, की गोव्यात येऊन पोट भरणाऱ्या परप्रांतीयांचा द्वेष करून चालणार नाही. या एकंदर स्थितीला आपणच जबाबदार आहोत. कदाचित साडेचारशे वर्षांची पोर्तुगीजांची राजवट त्याला कारणीभूत असेल. कारण त्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यावरही आम्ही आपणाला नेमके काय हवे व त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊ शकलो नाही.
कदाचित उपरोक्त राजवटीत तयार झालेली आपली मानसिकता त्याला कारणीभूत असेल. त्या राजवटीत मोजक्याच मंडळींच्या हाती सत्ता व मालमत्ता होती व गोवा मुक्त झाल्यानंतरही त्यात काही फरक पडला नाही. पोर्तुगीज अधिकारी लिस्बनमध्ये निघून गेले पण त्या जागी आलेल्या आपल्या अधिकारी व नेत्यांनी तीच परंपरा पुढे चालू ठेवली. पोर्तुगीज भाषेच्या जागी देशी व स्थानिक भाषांत शाळा सुरू झाल्या व नंतर हळूहळू बदल सुरू झाले.
सरकारी कामकाजासाठी लागणारे अधिकारी व इतरांची आयात मग शेजारी राज्यांतून केली गेली व तेथेच ही परप्रांतीयांची आवक सुरू झाली व नंतर तिने आजचे विशाल रुप धारण केले. स्पर्धेच्या युगात ‘सुशेगाद’पणाला स्थान नसते. तो जागतिक नियमच आहे. आपण तेथेच मार खाल्ला. त्यामुळे गोव्यातील एकूण एक परंपरागत व्यवसाय त्या क्षेत्रांत उतरलेल्या अशा परप्रांतीयांनी बळकावले. एकेकाळी पेडणेचा गवंडी, डिचोलीचा कुंभार, देमांदींतला सुतार, साष्टीचा कामगार गावडा हे त्या व्यवसायांतील जाणकार मानले जात.
पण आता ती पुराणातली वांगी ठरली आहेत. कारण बदललेल्या जीवनशैलींत नवी पिढी या व्यवसायात उतरलेली नाही. ती सरकारी नोकरी मिळेल,या प्रतीक्षेत राहिली. सरकारी कल्याणकारी योजनांमुळे तर आता घरकामालाही स्थानिक मोलकरिणी मिळत नाहीत. त्यांची जागा नेपाळी महिलांनी घेतली आहे. पूर्वी पदेर हा गोवेकरच पण आज सकाळी उठल्याबरोबर पाव घेऊन येणारा केरळीय असतो.
गोमंतकीय पदेर व भट्टया नावालाच उरल्यात. किराणा दुकाने सगळी गुजराती वा मारवाड्यांकडे गेलीत. आता ती रात्री दहापर्यंत खुली असतात. याला कारण आपणाला ते काम आवडत नाही, वा ते झेपत नाही. मग ते काम करणार कोण, आपण त्या लोकांच्या नावे बोटे मोडतो, आपली ‘अस्मिताय’ संपत असल्याचे म्हणतो. आपण आत्मपरिक्षण कधी करणार?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.