मुकेश थळी
ध्वनिप्रदूषणाविरोधात विद्यानंद बापट यांनी पुण्यात आघाडी उघडल्याने गणेशोत्सव काळात पारंपरिक वाद्यांना फाटा देऊन ‘डीजे’, प्लाझ्मा किंवा इतर ध्वनिवर्धकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषण व रस्त्यांवरील अडथळ्यांचा मुद्दा देशभरात चर्चेत आणि ऐरणीवर आला आहे. एरवी शांत निसर्गसुंदर वाटणारा गोवाही त्याला अपवाद नाही.
गोमंतकीयांचा अतिशय लाडका सण अर्थात चवथ तथा गणेशोत्सव काळात, दिवाळीत नरकासुर दहनावेळी आणि नववर्ष स्वागतावेळी ध्वनिप्रदूषण होत असते. ध्वनिप्रदूषणामुळे त्रस्त लोकांच्या तक्रारीही ध्वनिप्रदूषणामुळेच प्रशासनाच्या कानापर्यंत पोहचत नाहीत, अशा एकंदर तक्रारी आहेत. मात्र, गणपती बाप्पानेच आता डीजे, प्लाझ्माच्या कर्णकर्कश दणदणाटामुळे या त्रस्त जनसामान्यांची ऐकू न येणारी तक्रार ऐकावी, अशी भावना व्यक्त होतेय.
गणेशोत्सवात कर्णकर्कश ‘डीजे’ संगीत नको!
भाजप आमदार कृष्णा साळकर यांनी गणेशोत्सव मंडळांना चतुर्थीच्या उत्सवादरम्यान अश्लील गाणी आणि मोठ्या आवाजातील डीजे संगीत टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पारंपरिक दिंडी मिरवणुका काढण्याचे आणि आवाजाच्या मर्यादेचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी, पोलिस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत साळकर यांनी हे आवाहन केले.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिक, विशेषतः वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले आणि रुग्णांना त्रास होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदारांनी सांगितले की, सण साजरा करताना नाच-गाणी हा उत्सवाचा भाग असला तरी यामुळे इतरांना त्रास न होता आनंद मिळाला पाहिजे. गणेशोत्सवातील मोठा आवाज आणि ‘डीजे’च्या विरोधात नागरिकांमधून उठणाऱ्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन आले आहे.
गणेशोत्सव अन् ध्वनी प्रदूषण
गणेशोत्सवाचा खरा आनंद भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतन यात आहे. जर आपण ध्वनी प्रदूषणावर आवाज कमी करून व हवा प्रदूषणावर फटाके फोग नियंत्रणात ठेवून संतुलन राखलं तर चतुर्थी अधिक अर्थपूर्ण होईल. भक्तीभाव हा चवथीचा आत्मा आहे.
गणेशोत्सव हा गोव्याच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी हा उत्सव घरगुती स्वरूपात, शांततेत आणि भक्तिभावाने साजरा केला जात असे. माटोळी सजवणे, फुगड्या, पारंपरिक लोकगीते आणि घुमट आरत्या या उत्सवाचे मुख्य आकर्षण होते. गेल्या काही दशकांत गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे.
साधेपणा हरवला. सार्वजनिक मंडळे, मोठमोठे मंडप, भव्य सजावट आणि आधुनिक कार्यक्रमांनी उत्सवाला नवा रंग दिला आहे. या नवरंगांमुळे मूळ गाभ्यापासून दिशा तर बदलत नाही ना, असा प्रश्न पडतो. सार्वजनिक उत्सवातील सोडती हा वेगळाच विषय ठरला आहे.
बदलामुळे गणेशोत्सव अधिक आकर्षक आणि लोकाभिमुख झाला असला तरी त्याचबरोबर काही सामाजिक आणि पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे ध्वनी प्रदूषण. लाऊडस्पीकर, बॅण्ड आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम यामुळे आवाजाची पातळी वाढते. आनंद लहरींबरोबर या उच्च आवाजाच्या लहरी हवेत पसरून विविध परिणाम साधतात. परंपरेतील घुमट, भजन, आरत्या यांचा गोड भक्तीमय स्वर आता मोठ्या आवाजाच्या गोंगाटात हरवून तर जात नाही ना असं वाटतं. ध्वनी प्रदूषणाचा परिणाम मानवी आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही होतो.
गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा उत्सव आहे. त्यामुळे त्याचे स्वरूप जपताना संतुलन राखणे आवश्यक आहे. सार्वजनिक उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा पाळणे, पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणे, समाजभान जागवण्याचे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे.
नवीन पिढीला, युवतींना करंज्या (नेवऱ्या) करण्याचं प्रशिक्षण दिलं जावं. माझी आजी व नंतर आई नेवऱ्या बनवायची. गोड (साखरेच्या गुळाच्या) व तिखट करंज्या बनवायची. हा बेत १० दिवस अगोदरच चालायचा. आता सगळंच रेडीमेड मिळतं. मोदक बनवण्याचा आनंद असतो. तो भक्तीभावाने समरसून घ्यायचा असतो. पत्री म्हणजे काय, शरवडाचे (जे अती श्र्वेत असते) पान म्हणजे काय हे युवा पिढीने समजून घ्यायला हवं.
कित्येक घरात ५० प्लस वयोगटातील कौटुंबिक सदस्य गणेश अथर्वशीर्ष वाचतात. त्यात डॉक्टर, इंजिनियर, वकील सर्व व्यवसायातील भाविक असतात. परंतु आजची इंग्रजाळलेली पिढी आपणाला देवनागरी वाचायला अडखळायला होतं असं म्हणते, गणपतीस्तोत्र सुध्दा वाचायला अकार्यक्षमतेचं हेच निमित्त पुढे करते, हे चिंताजनक वाटते.
संयुक्त कुटंबात चाळीसेक तरी लोक एकत्र आल्यावर स्वयंपाकाच्या कंटाळ्यामुळे केटररचं जेवण आणलं जातं हे विचित्रच वाटतं. देवत्वाचा सात्विक आहार ही चीज अशावेळी गायब होते.
गणेशोत्सवाचा खरा आनंद भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतन यात आहे. जर आपण ध्वनी प्रदूषणावर आवाज कमी करून व हवा प्रदूषणावर फटाके फोग नियंत्रणात ठेवून संतुलन राखलं तर चतुर्थी अधिक अर्थपूर्ण होईल. भक्तीभाव हा चवथीचा आत्मा आहे. तोच हरवला तर आयोजन समूळ चलनवलनरहित व निश्र्चेष्ट होऊन जाऊ शकतं. या कायापालटात शास्त्रानुसार विधी, पूजा यांचा मूळ गाभा अदृश्य होणार नाही ना, याची सावधानता घेणं आवश्यक आहे. ती सुमती आम्हा पामरांना लाभावी, ही गणेशचरणी प्रार्थना.
...तर तक्रार करू शकता! :
जर तुम्हाला माहीत असेल की परिसरात आवाजाची पातळी ध्वनी मानकांपेक्षा १० dB(A) ने जास्त झाली आहे किंवा रात्री १० ते सकाळी ६ च्या दरम्यान ध्वनी प्रदूषण होत आहे, तर तुम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करू शकता.
न्यायालय खालील आदेश देऊ शकते
* आवाज थांबवण्यासाठी तात्पुरता आदेश वा मनाई हुकूम
*आवाज काढून टाकण्यासाठी वा तो नियंत्रित करण्यासाठी
*ध्वनी प्रदूषण दूर करण्याचा व आवाज थांबवण्याचा कायमस्वरूपी आदेश.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.