इन्क्विझिशन व संस्कृतीकरण या दोन्ही प्रक्रियांना एकाच तराजूत तोलून लेखक महाशयांनी एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी इन्क्विझिशन व संस्कृतीकरण या दोन्हींचे परिणाम सारखेच असल्याचे सांगून, जर कोणी इन्क्विझिशनचा निषेध केला किंवा त्यावर टीका केली, तर संस्कृतीकरणावरही तशीच टीका केली पाहिजे, असे प्रतिपादन केले आहे. तसेच खट्टरसारख्यांकडून या गोष्टीचे भान राखले जाणे महत्त्वाचे असल्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. मात्र वास्तवात या नियमाचे पालन तेवढ्याच कसोशीने त्यांच्या स्वतःच्या लेखनातही दिसणे आवश्यक होते.
विशेषतः इन्क्विझिशनचा स्पष्ट आणि योग्य शब्दांत धिक्कार होणे गरजेचे होते, परंतु तसे झालेले दिसून येत नाही. इन्क्विझिशन काळात गोमंतकीय जनतेने जे अमानुष अत्याचार सहन केले, ते पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी लादले होते. पोर्तुगीज हे मूलतः व्यापाराच्या निमित्ताने साता समुद्रापलीकडून गोव्यात आले; परंतु कालांतराने त्यांनी व्यापाराचा मार्ग सोडून धर्मांतर, म्हणजेच ख्रिस्तीकरणावर भर दिला. बळजबरीने आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध करण्यात आलेली ही धर्मांतरे क्रौर्य व अत्याचार यांची मूर्तिमंत उदाहरणे होती.
स्वतःच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी गोव्यासह इतर देशांतील गरीब जनतेवर अमानुष अत्याचार केले. परिणामी, गोमंतकीय जनतेला स्वतःच्या भूमीत राहूनही पोर्तुगिजांची गुलामगिरी पत्करावी लागली. इन्क्विझिशन काळातील अत्याचारांची केवळ आठवण जरी काढली, तरी अंगावर शहारे येतात. मुलांना पालकांसमोर फटके मारणे, अवयव कापणे, महिलांवर अमानुष अत्याचार करणे अशा क्रूर घटनांनी त्या काळाने मानवी संवेदनांचा कळस गाठला होता. आणि हे सर्व दोन शतके चालले.
लेखकाने पुढे असा आरोप केला आहे, की संस्कृतीकरणाच्या नावाखाली गोव्यातील देवस्थाने, पुरोहित वर्ग आणि उच्चवर्णीयांनी समाजातील कष्टकरीवर्गाच्या मालकीच्या जमिनी गिळंकृत केल्या. मात्र या मुद्द्याकडे दुसऱ्या बाजूने पाहण्याचीही गरज आहे. तथाकथित संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेत अनेक गोमंतकीयांनी जमिनी गमावल्या असतील, तर त्यामागे पोर्तुगीज राज्यकर्त्यांची दडपशाही आणि राजकीय गरजाही कारणीभूत असू शकतात.
राज्यकारभार चालवण्यासाठी शिक्षित आणि प्रशासनक्षम वर्गाची आवश्यकता असल्याने, कष्टकरी व शेतकरी वर्गाच्या ताब्यातील जमिनी काढून त्या सत्ताधारी वर्गाशी संबंधित लोकांना देण्यात आल्या असाव्यात. त्यामुळे सर्व दोष केवळ देवस्थाने किंवा उच्चवर्णीय समाजावर टाकणे योग्य ठरणार नाही. मानवाच्या उत्पत्तीपासूनच स्वतःचा उत्कर्ष आणि विकास साधण्याची प्रेरणा त्याच्यात राहिली आहे. आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंतचा प्रवास ही त्याच जिज्ञासेची आणि प्रगतीची फलश्रुती आहे.
मात्र या प्रगतीच्या प्रक्रियेत समाजरचना, व्यवस्थापन आणि सामाजिक संबंधांमध्ये बदल होणे अपरिहार्य असते. समाजात उलथापालथ घडते, नवीन सत्ताकेंद्रे निर्माण होतात आणि काही वर्गांना त्याचे लाभ किंवा तोटेही सहन करावे लागतात. त्यामुळे लेखकाने म्हटल्याप्रमाणे झालेल्या प्रत्येक बदलाचे संपूर्ण खापर देवस्थाने किंवा उच्चभ्रू वर्गावर फोडणे हे वास्तवाशी सुसंगत वाटत नाही. पोर्तुगीजकालीन गोमंतकीय इतिहासातील धर्मसमीक्षणाच्या काळ्याकुट्ट पर्वाला वक्त्यांनी थोडासा उजाळा देताच ज्या त्वरेने प्रतिक्रिया आल्या व पडसाद उमटले ते निश्चितच दखल घेण्याजोगे आहे.
गतेतिहासात माणसांकडून घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून इतिहास शिकवला जातो, कुणी नावे ठेवो अथवा न ठेवो, घडून गेलेल्या इतिहासाचे स्वरूप काही बदलता येणार नाही. ज्या पोर्तुगिजांनी आपली भूमी काबीज केली व आपल्याला पारतंत्र्यात ढकलले, आपल्याच देशात आपल्याला गुलाम बनवले. इतकेच नव्हे तर प्राणाहून प्रिय असलेला आपला धर्म सोडण्यासाठी, पाशवी उपाय योजले, त्या क्रूर राज्यकर्त्यांना नावे, ठेवायची नाहीत तर त्यांची काय पूजा बांधायची? धर्म समीक्षणाच्या बुरख्याआड शारीरिक व मानसिक छळाची परिसीमा गाठणाऱ्या सैतानी वृत्तीच्या राज्यकर्त्यांना नावे ठेवायची की पुसून टाकायची, ते ज्याने त्याने ठरवावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.