योगानंद बोरकर
निश्चयाशिवाय जीवन आकार घेत नाही. स्वीकारलेली जबाबदारी पूर्णत्वाला नेण्यास कुठल्या गोष्टीची कमतरता येईल, तिला कसे दूर सारायचे याचे नियोजन आधीच करावे लागते. काम करायचे ठरवले की ते सहज कधी होत नाही. आधी नियोजन करून ते सहज आणि सुलभ कसं करता येईल याची तंतोतंत काळजी घेणं आवश्यक असतं.
माणसाच्या मानसिकतेकडे डोळेझाक करू नका? माणसाची अस्वस्थता जाणून घेण्याचा तरी प्रयत्न करा. क्रोध न करता, समोरच्या माणसासाठी आपलं मन ओथंबलेलं पाहिजे. आपलं काम नेहमी सेवाभावी असावं. भावनावश आणि विचारशील सद्बुद्धीला पटेल हेच केले पाहिजे. सक्रिय निर्णय घेण्याचे धाडस केलं पाहिजे.
या बोरीच्या पुलावर विपरीत घडलं तर जबाबदारी कोण घेणार? बोरी पुलाचं काम हाती घेऊन दोन महिने उलटले लोकांची कुजबुज कानावर पडली म्हणून प्रत्यक्ष १७ जानेवारी रोजी मंत्री दिगंबर कामत यांना जाऊन भेटलो.
सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून दैनिक ‘गोमन्तक’मध्ये २० जानेवारी रोजी मनोगत व्यक्त करण्याचा निर्णय घेतला.
एका आठवड्याने पुन्हा मंत्र्यांना जाऊन भेटलो. त्यांनी १५ दिवसांत काम पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं. माझ्या माहितीप्रमाणे बोरी पुलाचं काम तीन विभागात वाटलेलं आहे. रस्त्याचं काम, रेलिंग आणि फुटपाथ रेलिंग आणि फुटपाथचं काम चालू आहे.
मंत्र्यांनी दि. १७ जानेवारी रोजी आश्वासन दिले होते ते पुलाचं, रस्त्याचं काम आजपर्यंत काहीच झालेलं नाही. एक कामगार कॉन्ट्रॅक्टर किंवा खात्याचा इंजिनिअर दिसला नाही. रस्त्यावर जे खड्डे पडलेले ते आदी बुजवलेले आहेत. त्याच्यातले अर्धे खड्डे दबलेले आहेत. पुलाचे जॉइन्ट आहेत त्या ठिकाणी सिमेंट उखडलेलं आहे. रोड वर दिसतात त्याच्यावर माती आणि सिमेंटचे खडे टाकून ठेवलेले आहेत.
लोकांचे हाल किती दिवस करणार? प्रत्यक्ष येऊन पाहणी करा. मी लिहिलेलं चुकीचं असेल तर येऊन बघा. प्रत्यक्ष कामाचे फोटो लेखासोबत जोडत आहे.
कॉन्ट्रॅक्टरला काम करण्यासाठी किती दिवसाची मुदत दिली होती, हे लोकांना आधी समजू द्या. सर्वसामान्यांना समाधानाने जीवन जगता आलं पाहिजे. कृतिशीलता महत्त्वाची. लक्षवेधक काम आपण करावं, इतरांना त्याचा उपयोग होईल.
कर्त्याला सात्त्विक समाधान मिळालं पाहिजे. मन ह्या नावाची शक्ती प्रसन्नतेचा शोध घेत असते. कामाला चालना मिळाली की मन तृप्त होते कर्तृत्व आणि नेतृत्व महत्त्वाचं. ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी प्रकाश आणता येईल का? याचा विचार आधी व्हावा.
समाजोपयोगी उपक्रमांना आधी प्राधान्य द्यावे. समन्वय महत्त्वाचा. समुदायाच्या अडचणींना आधी प्राधान्य दिले पाहिजे, तेव्हाच समोरच्या माणसाबद्दल उत्कंठा वाटेल. ह्या पुलाच्या कामासाठी एक दिवस वाया घालवणे म्हणजे मानवाचा घात करण्यासारखं आहे.
पूर्ण पुलावर गाड्या उभ्या असतात. गचके खात खात पैलतीर गाठावं लागतं. पुलावर उभं राहिल्यावर पूल किती हालतो हे अधिकाऱ्यांनी, मंत्रीमहोदयांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं बरं. बुद्धिमत्तेचं तेज जसे महत्त्वाचे असते तसेच विवेकबुद्धीही महत्त्वाची असते.
सारासार विचार म्हणजे विवेक बुद्धी. बुद्धी आहे एवढ्याने भागत नाही ती निश्चयात्मक हवी. आपण साहसी आणि तत्परतेने निर्णय घेतला नाही तर लोकांच्या मनातली हताशा कधी निघून जाणार नाही.
दिगंबर कामत यांच्याकडे क्षमता आहे. लोकांच्या हितरक्षणांसाठी तळमळ वाटली पाहिजे. आपण कार्यसिद्ध व्हायला हवं. वादापेक्षा संवादाचे सौंदर्य अधिक असते. मी आपणाला आर्ततेने प्रार्थना करतो विपरीत घडण्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण करा. काही विपरीत घडले, जीवहानी झाली की मगच लक्ष द्यायचे, असा काही शिरस्ता आहे का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.