पणजी : चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील पुष्पा साधारण फायर नाही तर वाईल्डफायर आहे आणि याच पुष्पाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. दक्षिण चित्रपट सृष्टीला काही दिवसांपूर्वी बॉलीवूडपेक्षा कमी समजलं जायचं पण बाहुबली, आमरण, आवेशम, मंजुमेल बॉईज यांसारख्या चित्रपटांनी दक्षिण अभिनय क्षेत्राला एक विशेष जागा मिळवून दिली आहे. सध्या फक्त दक्षिणेत नाही तर सगळ्या देशात राज्य करणाऱ्या पुष्पराज शिवाय इतर कोणतंही नावं ऐकू येत नाहीये.
साधारण ४०० ते ५०० कोटी रुपयांचा हा सिनेमा पैशांच्या हिशोबाने परफेक्ट बसलाय. पहिल्या चित्रपटात निर्मात्यांनी ठेवलेला सस्पेन्समुळे चाहते चित्रपटगृहांमध्ये रांग लावत आहेत आणि असा सस्पेन्स ठेऊन, प्रेक्षकांची उत्कंठा ताणून दुसरा भाग तेवढाच तगडा बनवणं म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखं असतं. पुष्पाचा दुसरा भाग हे शिवधनुष्य नीट पेलताना दिसलाय.
अल्लू अर्जुनच्या अभिनयाने या चित्रपटात खरोखर जीव ओतला आहे. बाहेरून केवळ लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित वाटत असला तरीही पुष्पा-२ मध्ये अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य केलं गेलंय. समाजात पसरत असलेला जातीयवाद किंवा महिलांसोबत होणारे अत्याचार यांवर पुष्पा आवाज उठवतो.
अल्लू अर्जुनने केवळ त्यांच्या अभिनयाचाच नाही तर नृत्याचा देखील वेगळाच अविष्कार घडवून आणला आहे. अनेक ठिकाणी गंभीर प्रसंगांना हसतखेळात मांडण्यात दिग्दर्शक सुकुमारला उत्तम जमलंय. याशिवाय चित्रीकरणासाठी निवडलेल्या जागा आणि कॅमेऱ्याचे शॉट्स आधुनिक चित्रपटांना साजेसे आहेत. ही गोष्ट पुष्पराजच्या राज्याबद्दल आहे आणि त्यानुसार बनवलेला भव्यदिव्य सेट, पुष्पाची श्रीमंती किंवा त्याचा वचक दाखवणं निर्माते तसेच कलाकारांना व्यवस्थित जमलंय.
चित्रपट गाजण्यासाठी पात्रांची निवड नीट झाली पाहिजे. पुष्पाच्या रागीट, खुनशी, कणखर आणि गर्विष्ठ तरीही प्रेमळ स्वभाव अल्लू अर्जुनला जमलाय मात्र याच पुष्पाला वेळोवेळी सांभाळून घेणारी श्रीविल्ली म्हणजेच रश्मीका सुद्धा तिचा भाग नीट पेलून नेते. एखादी भारतीय स्त्री ज्या प्रमाणे प्रत्येक स्थितीमध्ये नवऱ्याच्या पाठी उभी राहते तशीच श्रीवल्ली पुष्पाच्या पाठीशी उभी आहे, वेळेप्रसंगी भाबडी आणि निरागस श्रीवल्ली पुष्पासाठी समाजाशी भांडायला सुद्धा मागे पाहत नाही.
या दोघांशिवाय भवरसिंग शेखावत म्हणजेच फहाद फसील यांच्या अभिनयाला तोड नाही. पुष्पासारख्या हुशार आणि कधीही मागे न हटणाऱ्या माणसाला उत्तर देणारा पोलीस इन्स्पेक्टर भवरसिंग प्रेक्षकांच्या मनात घर करतो. या सिनेमाचे प्रमुख पात्र जरी पुष्पराज असला तरीही त्याला पुरून उरणारं पात्र फहादने रंगवलंय. दोन्ही बाजूंनी जेव्हा प्रतिस्पर्धी मागे हटायला तयार नसतात तेव्हा महाभारत घडतं आणि असंच काहीसं पुष्पाच्या दुसऱ्या भागात पाहायला मिळतंय.
या चित्रपटाची गाणी अभिनय, कलाकार आणि सेट यांच्या बरोबरीने जातात, मात्र काहीवेळा केलेला अतिरेक नकोसा वाटू शकतो. चित्रपटाच्या प्रमुख पात्राकडून या सिनेमात काही असामान्य शॉट्स घेतलेत निर्मात्यांची लिबर्टी असं जारी म्हटलं तरीही काही स्टंट्स कुठल्याही सामान्य माणसाला जमण्यासारखे वाटत नाहीत.
पुष्पा-२ चा प्रेक्षकवर्ग हा लहानमुलं देखील असू शकतात त्यामुळे काही ठिकाणी घेतलेले सीन्स चित्रपटात नसते तरीही चित्रपट नक्कीच चालला असता असं वाटतं. पुष्पा-२ एकूण ३ तास आणि २० मिनिटं चालतो, त्यामुळे अनेकवेळा चित्रपट संपून संपत नाहीये असं वाटू शकतं. शेवटी एकदा प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला नेऊन पोहोचवण्यात निर्माते पुन्हा यशस्वी झाले आहेत, ते का हे पाहण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहाला नक्कीच भेट द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.