Konkani Drama Competition Dainik Gomantak
मनरिजवण

Konkani Drama Competition: राकस, रहस्यनाट्याचे प्रभावी सादरीकरण; नाट्यसमीक्षा

Rakas Play Review: गूढ वातावरणात सुरू झालेले हे नाटक वेगवेगळ्या कलाटणी घेत क्लायमॅक्सला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते.

Sameer Panditrao

मिलिंद म्हाडगूत

पहिल्या दोन नाटकांमुळे स्पर्धेची काहीशी मंदावलेली गती एका दिवसाच्या विश्रांतीनंतर वेदांत एंटरटेनमेंट वाळपई या संस्थेच्या ‘राकस’ या नाटकाने सतेज सादरीकरण केले. स्पर्धात्मक रंगभूमीवरची नाटके कशी असायला हवी, याचे विहंग प्रात्यक्षिक ‘राकस’ ने घडविले.

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा प्रयोग असे या प्रयोगाचे वर्णन करावे लागेल. गूढ वातावरणात सुरू झालेले हे नाटक वेगवेगळ्या कलाटणी घेत क्लायमॅक्सला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. नाटकाला स्पर्धेची झालर असली तरी रहस्यमय कलाटणीमुळे या कलाकृतीला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली.

नाटकाचे मूळ लेखक म्हणून अतुल साळवी असून अविनाश नाईक यांनी या संहितेवर चांगले कोकणी संस्कार केले आहेत. त्यामुळे या नाटकाद्वारे गोव्यातील ग्रामीण भागातील चाल रीतीचे यथार्थ दर्शन होते. पडदा उघडतो तेव्हा भैरव व त्याची आई म्हणणारी चांडाली काहीतरी गूढ बोलत असल्याचे बघायला मिळते.

त्यावरून हे नाटक काही दृश्य अदृश्य आत्म्यावर बेतले आहे की काय? असे वाटायला लागते. त्यानंतर गाडी बिघडल्यामुळे शनाया व अर्थव या जोडप्याचे भैरव व चांडाली राहतात, तिथे आगमन होते. शनायाला विविध प्रकारचे भेसूर आवाज ऐकू यायला लागतात.

त्यामुळे ती घाबरते. त्यात परत भैरव व चांडालीचे विचित्र वागणे तिच्या भयात अधिकच भर घालते. तिथे राक्षस वावरतो आहे असा तिचा समज घातला जातो. पण जसे जसे नाटक पुढे जाते तसा तसा उलगडा होत जातो. हा एक पूर्वनियोजित डाव असल्याचे दिसून येते. तो एक शह -काटशहाचा प्रकार असून यामागचा सूत्रधार कोण आणि वजीर कोण? याचाही खुलासा होत जातो.

आता भैरव आणि चांडाली कोण, शनाया आणि अर्थव गाडी बिघडली म्हणून येतात का? त्यांना मुद्दाम तिथे आणले जाते, हे षडयंत्र कोण रचतो याची उत्तरे नाटकाच्या शेवटी मिळतात. या नाटकात दोन सरपटणाऱ्या आकृत्या दाखवल्या आहेत. नाटकाच्या गूढ वातावरणाला त्या पोषक वाटत असल्या तरी या पात्रांचा अन्वयार्थ काय?

याचा उलगडा मात्र शेवटपर्यंत होऊ शकला नाही. लेखक अविनाश नाईक हेच दिग्दर्शक असल्यामुळे ते नाटकाच्या संहितेला योग्य न्याय देऊ शकले. लेखक दिग्दर्शक असण्याचा हाच फायदा असतो. या नाटकातही हा फायदा अधोरेखित झाल्याचे बघायला मिळाले.

संहिता रेंगाळत आहे, असे दिसताच दिग्दर्शक अविनाश नाईक यांनी पात्रांना विविध मुव्हमेंट देऊन नाटक परत ट्रॅकवर आणले. पात्रे कमी असून सुद्धा त्यांनी नाटक कंटाळवाणे होऊ नये? याची पूर्ण दक्षता घेतल्याचे जाणवले. खास करून मध्यंतर व नाटकाच्या शेवटाला वाजणाऱ्या घंटा, त्याचबरोबर सरपटत येणाऱ्या त्या दोन आकृती यातून नाईक यांचे दिग्दर्शनावरचे प्रभुत्व प्रतीत झाले.

नेपथ्याचाही त्यांनी चांगला वापर करून घेतल्याचेही दिसून आले. संवादही समर्पक असल्यामुळे प्रयोग अधिक वेधक होऊ शकला. त्यांना योग्य साथ दिली, ती नाटकातील प्रमुख कलाकारांनी. भैरव झालेले दयानंद राणे त्या भूमिकेला चांगलेच शोभले. त्यांचे मंद गतीत बोलणे त्या भूमिकेला पूरक वाटले.

अर्थव झालेले शुभम हळदणकर योग्य वाटले तरी काही प्रसंगातला त्यांचा अति आरडाओरडा खटकला. मध्यंतराच्या वेळी त्यांचे ‘अंगात येणे’ मात्र टू द पॉईंट वाटले. तरी खरा कहर केला, तो चांडाली व शनाया झालेल्या खिलौनी गावस चांदेलकर व दीपिक्षा गावकर यांनी.

चांडाली या वयस्क पात्राचे बेअरिंग खिलौनी यांनी समर्थपणे राखले. त्यांच्या चालण्याला, बोलण्याला दाद द्यावी तेवढी थोडीच. काहीशी कपटी, काहीशी गूढ, काहीशी भित्री अशी शनाया दीपिक्षा यांनी रुबाबात उभी केली.

त्यांचा मुद्राभिनय वाखणण्यासारखाच. खास करून भैरवला आव्हान देणाऱ्या प्रसंगातला त्यांचा अभिनय तर जबरदस्तच होता. ग्रामीण भागातील महिला कलाकार सुद्धा अभिनयात किती परिपक्व व्हायला लागल्या आहेत. याची ही दोन ज्वलंत उदाहरणे. साई नंद वळवईकर यांची प्रकाशयोजना व संघर्ष वळवईकर यांचे रहस्यमय पार्श्व संगीत नाटकाला चार चाँद लावून गेले.

खास उल्लेख करावा लागेल, तो ज्ञानदीप च्यारी यांच्या नेपथ्याचा. एकीकडे भैरव बसतो ते झाड तर दुसऱ्या बाजूला पाषाणाची मूर्ती असे त्यांचे सुविहित नेपथ्य नाटकाला एक वेगळाच टच देऊन गेले. एकंदरीत योग्य टीम वर्कचे समीकरण जुळले की प्रभावी कलाकृती कशी निर्माण होऊ शकते हे या नाटकाने दाखवून दिले. म्हणूनच नाटकाचा उत्कृष्ट प्रयोग सादर करून स्पर्धेची रंगत वाढविल्याबद्दल ‘राकस’ नाटकाच्या संपूर्ण संचाचे हार्दिक अभिनंदन.

नाट्यगृह रिकामे

‘राकस’ या नाटकाचा बहारदार प्रयोग होऊन सुद्धा बघायला प्रेक्षक नसावे, याचा मात्र विषाद वाटला. बहुधा चॅम्पियन्स ट्रॉफी मधल्या त्यावेळी सुरू असलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा तो परिणाम असावा, असे वाटते. पण तरीही एवढी चांगली कलाकृती रिकाम्या नाट्यगृहाला दाखवावी लागावी, ही स्पर्धेच्या दृष्टीने शोकांतिकाच म्हणावी लागेल. मात्र जे काही मूठभर प्रेक्षक नाट्यगृहात होते, त्यांना या नाटकांने जिंकले असेच त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले.

समीक्षणाचे कौतुक

या कोकणी नाट्य स्पर्धेचे परीक्षण करणारे गोमन्तक हे एकमेव दैनिक असल्यामुळे उपस्थितात गोमन्तकाच्या या उपक्रमाचे कौतुक सुरू होते. पहिल्या दोन नाटकाचे केलेले परखड परीक्षण अनेक प्रेक्षकांना भावले असल्याचे त्यांच्या प्रतिक्रिया वरून दिसून येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT