ज्येष्ठ संगीतकार ए.आर. रहमान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत आपल्याला अपेक्षेपेक्षा कमी काम मिळत असल्याची कबुली दिली आहे. गेल्या आठ वर्षांत हिंदी फिल्म इंडस्ट्रीत सत्तेचे संतुलन बदलले असून, त्याचाच परिणाम आपल्यावर झाला असावा, असे त्यांनी सूचित केले. एका मुलाखतीत त्यांनी यामागे “साम्प्रदायिक घटक”ही असू शकतो, मात्र तो थेट समोर येत नाही, असे सांगितले.
ऑस्कर विजेते रहमान म्हणाले, “मी कामाच्या शोधात नसतो. काम माझ्यापर्यंत यावं, माझ्या कामातील प्रामाणिकपणामुळे संधी मिळाव्यात, असं मला वाटतं. स्वतःहून काम मागणं मला चुकीचं वाटतं.”हिंदी चित्रपटसृष्टीत १९९० च्या दशकात पदार्पण करताना कोणताही भेदभाव जाणवला का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, “कदाचित तेव्हा देवाने मला या गोष्टींपासून दूर ठेवलं असावं. पण गेल्या आठ वर्षांत परिस्थिती बदलली आहे. आता सर्जनशील लोकांपेक्षा सर्जनशील नसलेल्या लोकांकडे निर्णयाची सत्ता आहे.”
रहमान यांच्या मते, अनेक गोष्टी “चायनीज व्हिस्पर्स”सारख्या कानी येतात. “तुम्हाला बुक केलं होतं, पण म्युझिक कंपनीने शेवटी पाच इतर संगीतकार घेतले, असं कळतं. तेव्हा मी म्हणतो, ठीक आहे, मला थोडा आराम मिळेल, कुटुंबासोबत वेळ घालवता येईल,” असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.
आपण हिंदी चित्रपटसृष्टीत टिकून राहिलेले पहिले दाक्षिणात्य संगीतकार असल्याचेही रहमान यांनी नमूद केले. “तो पूर्णपणे वेगळा सांस्कृतिक अनुभव होता. इलैयाराजा सरांनी काही हिंदी चित्रपट केले होते, पण ते मुख्य प्रवाहातले नव्हते. त्यामुळे मला स्वीकारलं जाणं ही मोठी समाधानाची बाब होती,” असे ते म्हणाले.
‘रोजा’, ‘बॉम्बे’ आणि ‘दिल से…’ या मणिरत्नम यांच्या चित्रपटांनी लोकप्रियता मिळवली असली, तरी उत्तर भारतात आपल्याला घराघरात पोहोचवण्याचं श्रेय १९९९ मधील सुभाष घई दिग्दर्शित ‘ताल’ या चित्रपटाला असल्याचे रहमान यांनी सांगितले. “तो चित्रपट इतका लोकप्रिय झाला की जणू प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात पोहोचला,” असे त्यांनी म्हटले.
हिंदी भाषा शिकण्याबाबत सुभाष घई यांनी दिलेला सल्लाही त्यांनी आठवला. “मी तेव्हा हिंदी बोलू शकत नव्हतो. पण घई म्हणाले, ‘तुला इथे दीर्घकाळ टिकायचं असेल तर हिंदी शिक.’ त्यानंतर मी हिंदीसोबत उर्दूही शिकण्याचा निर्णय घेतला,” असे रहमान यांनी सांगितले.
दरम्यान, विकी कौशल अभिनित ‘छावा’ या चित्रपटाशी संबंधित वादग्रस्त प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. हा चित्रपट विभाजन करणारा वाटतो का, असे विचारले असता ते म्हणाले, “ त्याचा गाभा शौर्य दाखवण्याचा आहे. लोक इतके भोळे नाहीत. त्यांच्याकडे अंतःकरणाची जाणीव असते, काय सत्य आहे आणि काय हाताळणी आहे, हे ते ओळखू शकतात.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.