IRIS Dena Attack: हिंदी महासागरात इराणची अत्यंत आधुनिक मानली जाणारी 'आयआरआयएस देना' ही युद्धनौका बुडण्यापूर्वीचा घटनाक्रम अत्यंत अंगावर शहारे आणणारा आहे. इराण इंटरनॅशनलने दिलेल्या धक्कादायक वृत्तानुसार, या विनाशकारी हल्ल्याच्या काही क्षणांपूर्वी एका तरुण नाविकाने आपल्या वडिलांना फोन करुन तिथल्या थरारक घटनाक्रमाविषयी सांगितले होते.
अमेरिकन सैन्याने या युद्धनौकेवर हल्ला करण्यापूर्वी दोनदा ताकीद दिली होती. इराणी सैन्याला जहाज सोडून जाण्यास सांगितले होते. मात्र, जहाजाच्या कमांडरने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यास नकार दिला. यावरुन कमांडर आणि नाविकांमध्ये मोठी खडाजंगीही झाली होती. ज्या 32 नाविकांचे प्राण वाचले, त्यांनी कमांडरचा आदेश धुडकावून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लाइफबोटचा आधार घेतला, मात्र दुर्दैवाने आपल्या वडिलांशी शेवटचा संवाद साधणारा तो नाविक या हल्ल्यातून वाचू शकला नाही.
4 मार्च 2026 च्या पहाटे हिंदी महासागरात ही भीषण दुर्घटना घडली. अमेरिकेच्या 'यूएसएस शार्लोट' (USS Charlotte) या लॉस एंजेलिस क्लासच्या अण्वस्त्र सज्ज पाणबुडीने इराणच्या या युद्धनौकेवर 'मार्क 48' टॉरपीडोने अचूक मारा केला. हा हल्ला इतका भीषण होता की, टॉरपीडो लागताच अवघ्या काही मिनिटांत हे अवाढव्य जहाज समुद्राच्या तळाला गेले. या युद्धनौकेवर एकूण 180 कर्मचारी तैनात होते, त्यापैकी आतापर्यंत 87 जणांचे मृतदेह हाती लागले.
जेव्हा श्रीलंकेच्या नौदलाला मदतीचा संदेश मिळाला आणि ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तिथे युद्धनौकेचे नामोनिशाणही उरले नव्हते. समुद्राच्या पृष्ठभागावर फक्त तेलाचा तवंग, काही रिकाम्या लाइफ राफ्ट्स आणि मदतीसाठी आर्त हाक मारणारे नाविक तरंगताना दिसत होते. या घटनेला अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी 'खामोश मौत' असे संबोधले.
विशेष म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतर तब्बल 80 वर्षांनी अमेरिकेच्या एखाद्या पाणबुडीने शत्रू राष्ट्राची युद्धनौका बुडवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता केवळ खाडी देशांपुरता मर्यादित न राहता दूरवरच्या समुद्रात पसरल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचे पडसाद भारतामध्येही उमटले, कारण बुडण्यापूर्वी अवघ्या आठवडाभरापूर्वीच 'आयआरआयएस देना' ही युद्धनौका भारतीय नौदलाची (Indian Navy) पाहुणी होती. विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या 'मिलन 2026' या बहुराष्ट्रीय नौदल सरावात या जहाजाने मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत सराव करणारे हे जहाज अचानक अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्याने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.
इराणचे (Iran) परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतानाच, हे जहाज इराणच्या किनारपट्टीपासून तब्बल 3000 किलोमीटर दूर असल्याचे सांगितले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या बदलत्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना समुद्रातील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. ही घटना केवळ एका जहाजाचा नाश नसून येणाऱ्या काळातील एका मोठ्या संघर्षाची नांदी मानली जात आहे. समुद्राच्या खोल पाण्यात सुरु असलेले हे 'सायलेंट वॉर' आता अधिक उग्र रुप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.