Pakistan Army Terrorist Organization Allegation: सध्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर हे हज यात्रेवर गेले आहेत, मात्र दुसरीकडे त्यांच्याच देशात लष्कराच्या भूमिकेवर आणि मुनीर यांच्या मानसिक स्थितीवर तीव्र शब्दांत चिखलफेक सुरु आहे. पाकिस्तानचे लष्कर सध्या एखाद्या दहशतवादी संघटनेसारखे काम करत असून आसिम मुनीर हे एक लहरी हुकूमशहा बनले आहेत, असा थेट आरोप पाकिस्तानी पत्रकारांनी उघडपणे वृत्तवाहिन्यांवर केला.
आपल्याच जनतेचे रक्त सांडताना पाहून मुनीर यांना आनंद होतो, अशा गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी चार वर्षांपूर्वी आसिम मुनीर यांच्या मानसिक आरोग्याबाबत केलेली एक टिप्पणी आता प्रचंड चर्चेत आली. 'हा माणूस एक दिवस संपूर्ण देश उद्ध्वस्त करेल', असा इशारा बाजवा यांनी दिला होता, जो आजच्या परिस्थितीला पाहता तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे.
त्याचवेळी, पाकिस्तानी न्यूज पोर्टल्सवर असा दावा केला जात आहे की, आज संपूर्ण पाकिस्तान केवळ एका व्यक्तीचा लहरीपणा सहन करत आहे. आसिम मुनीर हे असे लष्करप्रमुख आहेत जे कोणत्याही आंदोलनावर थेट एके-47 चालवण्याचे आदेश देतात, तर लाठीचार्ज ही त्यांच्यासाठी अगदी सामान्य गोष्ट बनली आहे. त्यांच्या या लहरीपणामुळे केवळ सामान्य जनताच नाही, तर पाकिस्तानी लष्कराचे जवानही मारले जात आहेत.
याची सर्वात मोठी उदाहरणे म्हणजे बलुचिस्तान आणि पीओके (पाकव्याप्त काश्मीर) आहेत, जिथे आपल्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांचा मुनीर यांनी क्रूरपणे छळ केला. पीओकेमधील बंड मोडून काढण्यासाठी मुनीर यांनी जे रक्ताळलेले मार्ग अवलंबले, ते संपूर्ण जगाने पाहिले.
पाकिस्तानी पत्रकारांच्या मते, तिथे माध्यमांवरही प्रचंड निर्बंध लादले गेले आहेत. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही मुनीर यांच्या आदेशावरुन मारहाण करण्यात आली. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार मोईद पीरजादा यांनी काही काळापूर्वी मुनीर यांची तुलना थेट हिटलरशी केली होती आणि मुनीर यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळेच आपण पाकिस्तानात राहू इच्छित नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, जर तिथे सत्तेचा अर्थ लष्कर असा असेल, तर त्या लष्कराचे हात स्वतःच्याच जनतेच्या रक्ताने माखलेले आहेत.
या सगळ्या परिस्थितीची पाळेमुळे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्या एका जुन्या इशाऱ्यात सापडतात. बाजवा जेव्हा लष्करप्रमुख होते आणि इम्रान खान पंतप्रधान होते, तेव्हा बाजवा यांनी इम्रान खान यांना एक गुप्त सल्ला दिला होता. 22 ऑगस्ट 2022 रोजी पत्रकारांसोबत झालेल्या एका बैठकीत इम्रान खान यांनी स्वतः या गुप्त भेटीचा खुलासा केला होता. बाजवा अत्यंत घाबरलेल्या आवाजात इम्रान खान यांच्याकडे आले होते आणि त्यांनी बजावले होते की, चुकूनही आसिम मुनीर यांना पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख बनवू नका, कारण ते मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीत.
जर ते लष्करप्रमुख झाले, तर देशात अशी अराजकता माजेल जी कोणालाही सांभाळता येणार नाही. आज पाकिस्तान ज्या आर्थिक दिवाळखोरी, महागाई आणि अंतर्गत बंडाळीचा सामना करत आहे, तो आसिम मुनीर यांच्या याच मानसिक अस्थिरतेचा परिणाम असल्याचे बोलले जात असून, बाजवा यांची ती जुनी चेतावणी आज पाकिस्तानसाठी गळ्यातील फास ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.