Shreyas Iyer Father Reaction: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली, तर काही महत्त्वाच्या आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना डावलण्यात आले. त्यापैकीच एक नाव म्हणजे अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर. आयपीएल 2025 मध्ये आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही धावांचा पाऊस पाडूनही त्याला संघात स्थान न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आता यावर श्रेयसच्या वडिलांनी म्हणजेच संतोष अय्यर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना संतोष अय्यर यांनी आपली निराशा स्पष्टपणे व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्या मुलाला, श्रेयसला भारतीय टी-20 संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय करायला हवं, हे मला कळत नाही. तो गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल्सपासून ते कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सपर्यंत, त्याने कर्णधार म्हणूनही शानदार कामगिरी करुन दाखवली.”
श्रेयसच्या नेतृत्वाखालील कामगिरीचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले, “त्याने 2024 मध्ये केकेआरला आयपीएलचे (IPL) विजेतेपद मिळवून दिले. तसेच, या वर्षी त्याने पंजाब किंग्सला (PBKS) फायनलपर्यंत पोहोचवले. मी असे म्हणतच नाही की, माझ्या मुलाला भारतीय संघाचा कर्णधार बनवा, पण किमान त्याला संघात तरी स्थान द्या.”
संतोष अय्यर यांनी आपल्या मुलाच्या शांत आणि संयमी स्वभावाचेही कौतुक केले. ते म्हणाले, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याला भारतीय संघातून (Team India) बाहेर काढले तरी त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही नाराजी दिसत नाही. तो नेहमी शांत राहतो आणि कोणावरही दोषारोप करत नाही. तो फक्त इतकंच म्हणतो, ‘हे माझं नशीब आहे! आता तुम्ही काहीच करु शकत नाही.’ पण अर्थातच, आतून तो निराश आहे.” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्रेयसच्या अलीकडील कामगिरीवर नजर टाकल्यास त्याच्या वडिलांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे दिसून येते. आयपीएल 2025 मध्ये त्याने 17 सामन्यांमध्ये 50.33 च्या दमदार सरासरीने 604 धावा केल्या. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच पंजाब किंग्सचा संघ फायनलपर्यंत पोहोचू शकला. याशिवाय, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. 5 सामन्यांमध्ये त्याने 48.६60 च्या सरासरीने 243 धावा केल्या होत्या आणि तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला होता.
एकंदरीत, श्रेयस अय्यरच्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीनंतरही त्याला आशिया कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत स्थान न मिळाल्याने क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. निवड समितीने कोणत्या निकषांवर ही निवड केली, यावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.