Rajnath Singh Warning To Pakistan On Terrorism: द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावरुन कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात बोलताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारताला परत मिळेपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका राजनाथ सिंह यांनी मांडली.
पाकिस्तानने (Pakistan) दहशतवादाला आपल्या सरकारी धोरणाचे अधिकृत हत्यार बनवले, असा घणाघाती आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानचे लष्कर आणि त्यांनी पाळलेले दहशतवादी गट यांच्यात कोणताही फरक उरलेला नाही. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या प्रत्येक कुरापतीला भारतीय सशस्त्र सेना चोख आणि तितकेच सडेतोड उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना यापूर्वीच चारी मुंड्या चित केले असून भारताची क्षमता आणि तयारी जगाने पाहिली आहे.
1999 च्या कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या अमर शहीदांना श्रद्धांजली वाहताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, तो संघर्ष केवळ सैनिकी आणि राजनैतिक विजय नव्हता, तर भारतीय जवानांचे शौर्य, दृढ संकल्प आणि त्यागाचे अद्वितीय उदाहरण होते. कारगिल स्मृती स्थळावर कोरलेली नावे भारतातील प्रत्येक धर्म, प्रदेश आणि समुदायाचे प्रतिनिधित्व करतात, जे देशात फूट पाडू पाहणाऱ्या राष्ट्रविरोधी शक्तींना राष्ट्रीय एकतेचा सर्वात मोठा धडा शिकवतात.
कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर दोन्ही देशांमधील प्रचंड तफावत स्पष्ट करताना ते म्हणाले की, भारत आज इनोव्हेशन, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर निर्मिती, स्टार्टअप्स आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या जोरावर वेगाने प्रगती करत आहे. याउलट, पाकिस्तान मात्र दहशतवाद, कट्टरतावाद आणि सीमापार घुसखोरीच्या दलदलीत रुतला आहे. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20व्या वर्षी स्वतःचे स्वप्न आणि प्राण अर्पण करणाऱ्या तरुण शूरवीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आठवून ते भावूक झाले. देशाच्या अखंडतेसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या भारतमातेच्या वीर पुत्रांना त्यांनी आदराने सलाम केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.