नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि प्रमुख नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांबद्दल त्यांच्या आदरभावनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांची वक्तव्ये केवळ देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या शूर सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करत नाहीत, तर जनतेमध्ये संशय आणि फुटीचे वातावरणही निर्माण करत असल्याच्या चर्चा सुरु असून देशाची एकता आणि सुरक्षेसाठी ही परिस्थिती एक गंभीर आव्हान बनली आहे.
राहुल गांधी वारंवार भारताच्या सुरक्षा यंत्रणांच्या हेतू आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या संस्थांना पाठिंबा देण्याऐवजी, ते त्यांच्या कृतींचे राजकारण करत आहेत. देशाला सर्वाधिक एकजुटीची आणि विश्वासाची गरज असलेल्या वेळी हा कल अधिक धोकादायक ठरतोय.
याचे ताजे उदाहरण भोपाळ येथील काँग्रेसच्या रॅलीत दिसून आले. इथे राहुल गांधींनी अलीकडील लष्करी तणावाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तानसोबत काम केल्याचा आरोप केला.
ट्रम्प यांच्या फोन कॉल नंतर, पंतप्रधानांनी "नरेंद्र, सरेंडर" चा आदेश स्वीकारला आणि "येस सर" म्हणून नमले, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर दोन-पॅनेल कार्टूनद्वारे या विधानाला प्रोत्साहनही दिले.
राहुल गांधींनी लष्कराच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बालाकोट आणि उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी 'व्हिडिओ पुरावा' मागून त्यांनी लष्कराच्या शौर्यावरही शंका व्यक्त केली होती. गलवान संघर्ष दरम्यान, जेव्हा देशाने एकजूट होणे अपेक्षित होते, तेव्हा त्यांनी या मुद्द्याला राजकीय रंग देऊन सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
काँग्रेस भारतीय बाजूच्या नुकसानीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना, पाकिस्तानच्या मोठ्या नुकसानीकडे दुर्लक्ष करते. या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानची दहशतवादी रचना कोसळली आहे. हे निष्पक्ष आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनीही मान्य केले आहे. पण याउलट राहुल गांधींनी यशाकडे दुर्लक्ष करणे काँग्रेससाठी आता राष्ट्रीय हितापेक्षा राजकीय फायदा जास्त महत्त्वाचा असल्याचे दाखवून देत आहे.
जगभरात अनेक भागांमध्ये - रशिया-युक्रेन युद्ध किंवा इस्रायल-हमास संघर्ष - राजकीय पक्षांनी लष्कराशी एकजूट दाखवली आहे, भलेही त्यांचे आपापसातील मतभेद कितीही खोल असले तरीही जगासमोर ते कायमच एकसंध राहिले आहेत. पण भारतात, काँग्रेस आणि राहुल गांधींनी प्रत्येक लष्करी संकटाला सरकारवर हल्ला करण्याची संधी बनवले आहे.
भारत एक उदयोन्मुख जागतिक शक्ती आहे आणि आपल्या लष्कराला जागतिक स्तरावर सन्मान आहे. सीमांचे रक्षण करणारे सैनिक आपले जीवन धोक्यात घालतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही लष्करी मोहिमेमध्ये शून्य नुकसानीची अपेक्षा करणे केवळ अव्यवहार्य नाही, तर सैनिकांच्या त्यागाचा अपमान आहे. राहुल गांधींची वक्तृत्वशैली आपल्या सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करते आणि शत्रूंना बळ देते. त्यांची वक्तव्ये केवळ सरकारलाच नव्हे, तर देशाच्या सुरक्षेत गुंतलेल्या लष्करालाही लक्ष्य करतात.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत स्पष्टता आणि चिकाटी दाखवली आहे. आता वेळ आली आहे की, विरोधकांनीही परिपक्वता आणि राष्ट्रीय हिताच्या भावनेने वागावे. भारताची ताकद त्याच्या एकजुटीत आहे. जेव्हा देश धोक्यात असतो, तेव्हा राजकीय स्वार्थ नाही, तर राष्ट्रीय अभिमान आणि एकजूट, हे सर्वात मोठे कर्तव्य बनते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.