नवी दिल्ली: पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच असून, रात्री देखील पाककडून भारतातील विविध नागरी वस्तीवर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानने राजौरी, अखनूर, उधमपूर, पूँछ, पठाणकोट, जलंधर (पंजाब), जम्मू शहर, मुघलानी कोट (पंजाब), अमृतसर, बारमर (राजस्थान), फिरोजपूर (पंजाब) अशा २६ ठिकाणी हल्ले केले.
राजौरी, जम्मू येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यू झाला आहे. प्रत्युत्तर दाखल भारताने पाकिस्तानचे चार एअरबेस टार्गेट केल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानची भारताविरोधात आगळीक सुरुच असून, शनिवारी रात्री पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणी हल्ला केला. पाकिस्तानने विशेषत: नागरी वस्तीवर हल्ला केला, यात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारताने देखील पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. जम्मू आणि काश्मीर येथील उधमपूरमध्ये हल्ल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर अवकाशात धूराचे लोट दिसत होते. तसेच, राजौरी आणि अखनूर मध्ये देखील हल्ला केल्याचे उघडकीस आले. यात सरकारी अधिकाऱ्यासह पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
एलओसीवरुन पाकिस्तान सातत्याने गोळीबार करत असून, जम्मू, सांबा आणि पठाणकोट परिसरात पाकिस्तानी ड्रोन दिसून आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. जलंधर येथे पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. यात घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. कंगणीवाल गावात हा हल्ला झाल्याचे उघडकीस आले असून, एक पाकिस्तानी बनावटीचा ड्रोन आढळून आला आहे. या हल्ल्यात घरांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
भारतीय अधिकाऱ्याचा मृत्यू
पाकिस्तानकडून सुरु असलेल्या शेलिंगमध्ये भारतीय प्रशासकिय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीर भागात सातत्याने शेलिंग केले जात आहे. राजौरी येथे झालेल्या या शेलिंगमध्ये जम्मू काश्मीरचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी याबाबत वृत्ताला दुजोरा देत घडलेल्या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
भारताकडून चार पाकिस्तानी एअरबेसवर हल्ला
पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताकडून जशास तसे उत्तर देण्यात आले असून, चार पाकिस्तानी एअरबेस टार्गेट करण्यात आले, असे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिले आहे. बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला याठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आल्यानंतर भारताने शनिवारी पहाटेच्या सुमारास हा हल्ला केल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानी पोस्ट उद्धवस्त
ट्युब आणि ड्रोन हल्ले होत असलेल्या पाकिस्तानी पोस्ट आणि दहशतवादी लॉन्च पॅड भारताने उद्धवस्त केले आहे. जम्मू येथे कार्यरत असलेल्या भारतीय लष्करी दलाने ही कारवाई केल्याची माहिती सुरक्षा दलाच्या हवाल्याने पीटीआयने दिली आहे.
"पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रात्र हल्ला करण्याचे प्रमाण वाढवले आहे. आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा येथे पाकिस्तानी सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. भारतीय हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर त्वरित हल्ला करून ते नष्ट केले."
"भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल", असे भारतीय सैन्य दलाने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.