
नवी दिल्ली: भारतातील शहरांवर हल्ले करतानाच भारतावरच चुकीचे आरोप करत कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज उघडे पाडले. पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतात लेह ते सर खाडीपर्यंत ३६ ठिकाणी सुमारे ४०० ड्रोनद्वारे हल्ला करून सर्वसामान्य नागरिकांना आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तान आपले हवाई क्षेत्र बंद न करता नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करत आहे, असा हल्लाबोलही भारताने केला. तसेच, आपल्याच शहरांना भारत लक्ष्य करत असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विचित्र कल्पनाविलास असल्याची खिल्लीही भारताने उडवली.
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानी चिथावणीला भारतीय सैन्यदलांनी दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल विक्रम मिस्त्री, लष्कराच्या प्रतिनिधी कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या प्रतिनिधी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
कर्नल कुरेशी यांनी सांगितले, की पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी मध्यरात्री व आज पहाटे लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि नियंत्रण रेषेवरही गोळीबार केला. यात आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ३६ ठिकाणी ३००-४०० ड्रोन घुसविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भारताने यापैकी अनेक ड्रोन पाडले. एवढ्या मोठ्या हवाई घुसखोरीचा उद्देश हवाई संरक्षण यंत्रणेची माहिती मिळविण्याचा आणि हेरगिरीचा होता. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ड्रोन हे तुर्कियेने त्यांना दिलेले ‘असिसगार्ड सोंगर’ ड्रोन असल्याचेही कुरेशी यांनी सांगितले.
परराष्ट्र सचिव मिस्री यांनी पाकिस्तानवर टीका केली. भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा हास्यास्पद नकार हे त्यांच्या दुटप्पीपणाचे उदाहरण असल्याचे मिस्री म्हणाले. प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानातील चार हवाई संरक्षण स्थळांना सशस्त्र ड्रोनने लक्ष्य केले आणि एक हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शाळा आणि धार्मिक स्थळांवरही हल्ला केले. पूँचमधील शाळेवर झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. गुरुद्वारा, चर्च आणि मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांनाही लक्ष्य करून पाकिस्तान गोळीबार करत आहे. भारताने नानकाना साहीब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याचा दावा धादांत खोटा आहे, हेतुपुरस्सर धार्मिक दंगली भडकाविण्यासाठी पाकिस्तान असे प्रयत्न करत असल्याचा आरोप विक्रम मिस्री यांनी केला.
जम्मू : पाकिस्तानने आज सलग तिसऱ्या दिवशी भारतातील विविध शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. पाकिस्तानने पंजाब, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमधील सीमावर्ती भागांमध्ये रात्री नऊनंतर हल्ल्यांना सुरुवात केली. भारताने हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने बहुतांश हल्ले परतवले. काही ठिकाणी मात्र ड्रोन पडून आग लागल्याच्या घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. फिरोजपूर येथे ड्रोन कोसळून एका घरातील तीन जण जखमी झाल्याचेही समजते.
पाकिस्तानच्या हल्ल्यांना दोन दिवस जोरदार प्रत्युत्तर मिळूनही त्यांनी आज पुन्हा भ्याड मारा केला. त्यामुळे जम्मू, श्रीनगरसह काही शहरांमध्ये वीजबंद करण्यात आली होती. तसेच धोक्याची सूचना देणारे सायरनही वाजविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले निकामी केले. याबरोबरच पाकिस्तानच्या दिशेनेही काही ड्रोन सोडल्याचे समजते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.