Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा फासणारी आणि हृदय हेलावून टाकणारी एक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूर येथून समोर आली. गोरखपूरमधील कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरोहियांमध्ये आईच्या निधनानंतर मोठ्या मुलाने तिचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. "घरात मुलाचे लग्न आहे, अशा वेळी आईचे प्रेत घरी आले तर मोठा अपशकुन होईल. चार दिवस मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा. लग्न झाल्यावर येऊन अंत्यसंस्कार करेन," असे तो म्हणाला. मुलाच्या या उत्तराने जौनपूर येथील वृद्धाश्रमात असलेले वृद्ध वडील ढसाढसा रडू लागले.
कॅम्पियरगंज येथील किराणा व्यापारी भुआल गुप्ता यांचे कुटुंब तसे आनंदी होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी शोभा देवी (65), तीन मुले (संजय, जग्गू, अज्जू) आणि तीन मुली होत्या. सर्वांचे विवाह झाले. भुआल गुप्ता यांनी सांगितले की, "एक वर्षापूर्वी माझा मोठा मुलगा संजय याने 'तुम्ही आमच्यावर ओझं झाला आहात' असे म्हणून आम्हाला घरातून बाहेर काढले." या अपमानामुळे संतप्त होऊन ते पत्नी शोभा देवीसह राजघाटजवळ आत्महत्या करण्यासाठी गेले. मात्र तिथे उपस्थित एका व्यक्तीने त्यांना थांबवले आणि जौनपूरच्या वृद्धाश्रमाचा पत्ता दिला, जिथे त्यांना विकास समिती वृद्धाश्रमाचे रवी कुमार चौबे यांनी आश्रय दिला.
वृद्धाश्रमात असताना भुआल गुप्ता आणि त्यांच्या पत्नी शोभा देवी अधूनमधून फोन करुन लहान मुलगा अज्जूशी बोलत असत. दरम्यान, शोभा देवींना अचानक लकवा मारल्यामुळे त्या अंथरुणाला खिळल्या. 19 नोव्हेंबर रोजी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि त्यांना जौनपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचे आणि संसर्ग झाल्याचे सांगितले.
पत्नीच्या निधनानंतर भुआल गुप्ता खूप रडले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मुलाला माहिती देण्यास सांगितले. त्यांनी लहान मुलाचा मोबाइल नंबर दिला. रवी कुमार चौबे यांनी लहान मुलाला फोन करुन आईच्या निधनाची माहिती दिली. तेव्हा लहान मुलाने "मोठ्या भावाच्या मुलाचे 23 नोव्हेंबरला लग्न आहे, विचारुन सांगतो" असे सांगितले. थोड्या वेळाने त्याने परत फोन करुन सांगितले की, "मोठा भाऊ (संजय) म्हणाला आहे की, आईचे प्रेत फ्रीजरमध्ये ठेवून द्या. चार दिवसांनी लग्न झाल्यावर आम्ही येऊन अंत्यसंस्कार करु." हे ऐकून भुआल गुप्ता खूप दुखावले आणि त्यांनी जौनपूरमध्येच अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली.
थोड्या वेळाने मुलींनी फोनवर वडिलांशी बोलून त्यांना धीर दिला. त्यानंतर गावकरी आणि नातेवाईकांनी भुआल गुप्ता यांना समजावून मृतदेह घेऊन गोरखपूरला येण्यास सांगितले. रवी चौबे यांनी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करुन भुआल गुप्ता यांना मृतदेह घेऊन गोरखपूरला आणले. मात्र, मोठा मुलगा संजय याने मृतदेह घरात घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. अखेर गावकरी आणि नातेवाईकांनी भुआल गुप्ता यांना समजावून कॅम्पियरगंज येथील घाटकिनारी शोभा देवींच्या मृतदेहाला हिंदू रितीरिवाजानुसार अग्नी न देता, दफन केले.
भुआल गुप्ता पत्नीला आठवून वारंवार रडत होते. ते म्हणाले, "माझ्या पत्नीचे हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कारही झाले नाहीत. तिला मातीत दफन केले. तिथे तिला किडे खातील." या घटनेमुळे गावात आणि समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळली. पंडितजींच्या सल्ल्यानुसार, भुआल गुप्ता आता पत्नीच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिठाचा पुतळा बनवून त्याचे विधीवत अंतिम संस्कार करणार आहेत. मोठा मुलगा संजयने वडिलांनी कर्ज घेतल्याने वाद झाला आणि ते घर सोडून गेल्याचे म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.