
Uttar Pradesh Lynching Case: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी (17 ऑक्टोबर) उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे रायबरेली लिंचिंग पीडित हरिओम वाल्मीकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशभरात दलित पीडितांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन दिले. भेट दिल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, "काही दिवसांपूर्वी एका दलित अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती, मी तिथे गेलो होतो... आणि आज मी येथे आलो आहे. या कुटुंबाने कोणताही गुन्हा केलेला नाही, तरीही त्यांच्यासोबत गुन्हेगारांसारखे वागले जात असून त्यांना त्यांच्या घरातच कोंडून ठेवले आहे."
दरम्यान, राहुल गांधी हरिओम यांच्या घरी पोहोचण्यापूर्वीच एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला. पीडित कुटुंबाने कथितरित्या एक व्हिडिओ जारी केला, ज्यात त्यांनी राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना 'राजकारण करण्यासाठी आमच्याकडे येऊ नका, असे स्पष्ट आवाहन केले.
या व्हिडिओमध्ये हरिओम यांचा भाऊ बोलताना दिसतोय. तो म्हणाला, "मी हरिओम वाल्मीकी याचा धाकटा भाऊ शिवम वाल्मीकी आहे. हरिओमला रायबरेलीमध्ये मारहाण करुन ठार करण्यात आले. सरकारी मंत्र्यांनी आम्हाला भेट दिली आहे आणि आर्थिक मदत तसेच नोकरी दिली आहे. सरकारच्या मदतीवर आम्ही समाधानी आहोत. माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि इतर पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी इथे राजकारण करण्यासाठी येऊ नये."
दुसरीकडे मात्र, हा व्हिडिओ सरकारने दबाव टाकून जारी करवला असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष हिंदवी म्हणाले, "हे वक्तव्य सरकारच्या दबावाखाली देण्यात आले. राहुल गांधींनी कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली, पण सरकारने एक वेगळा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला."
ते पुढे म्हणाले, "त्यांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना हरिओम यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यापासून रोखले. त्याऐवजी त्यांच्या मंत्र्यांना पाठवण्यात आले. राहुल गांधींनी दलित पीडितांना भेटू नये, अशी त्यांची इच्छा आहे."
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, "देशभरात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. त्यांची हत्या केली जात आहे. बलात्कार होत आहेत. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे की, त्यांनी त्यांना न्याय द्यावा, त्यांचा आदर करावा आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करावी."
राहुल पुढे म्हणाले, "देशात जिथे जिथे दलितांवर अत्याचार होत आहेत, तिथे काँग्रेस पक्ष पोहोचेल. आम्ही शक्य असेल तिथे मदत करु आणि न्यायासाठी लढू."
दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राहुल गांधींवर 'राजकीय नाटक' (Political Drama) करण्याचा आरोप केला. 'एक्स'वर पोस्ट करताना मौर्य यांनी लिहिले, "श्री राहुल गांधीजी, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हा तुमचा फक्त फोटो-ऑप कार्यक्रम आहे. अनेक आरोपींना अटक झाली आहे. पीडित कुटुंबाच्या दुःखाची तुम्हाला पर्वा नाही. हे नाटक थांबवा."
2 ऑक्टोबर रोजी रायबरेलीतील दांडेपूर जामुनापूर गावात हरिओम (38) यांना ड्रोन चोर समजून 100 लोकांच्या जमावाने बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान हरिओम यांनी राहुल गांधींचे नाव घेतल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसले होते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 14 हून अधिक आरोपींना अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.