ॲड. शिवाजी देसाई
देशाची प्रगती ही शिक्षणावर आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेवर अवलंबून असते. कोणत्याही विद्यार्थ्याचे आयुष्य घडविण्यात परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु गेल्या काही वर्षांत देशभरात परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणाऱ्या पेपरफुटी, गैरव्यवहार, परीक्षा रद्द होणे आणि भरती प्रक्रियेतील अनियमितता या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे.
‘नीट’ (NEET) परीक्षेतील घोटाळ्यानंतर आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET), पुणे महानगरपालिका भरती परीक्षा, विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा तसेच इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्येही गंभीर अनियमिततेचे आरोप झाले आहेत. ऐन परीक्षेच्या काही तास आधी परीक्षा रद्द होणे ही कोणत्याही सक्षम व्यवस्थेसाठी लाजिरवाणी बाब आहे. लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यासाठी हा केवळ प्रशासकीय दोष नसून मानसिक, आर्थिक आणि सामाजिक धक्का असतो.
विद्यार्थी अनेक वर्षे अथक परिश्रम करून परीक्षेची तयारी करतात. काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही शिक्षण सुरू ठेवतात. पालक कर्ज काढून मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च करतात, कोचिंग क्लासेस लावतात आणि परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खर्च करतात. परंतु काही भ्रष्ट व्यक्तींच्या लोभामुळे आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे या सर्व मेहनतीवर एका क्षणात पाणी फिरते.
पेपरफुटीमुळे सर्वाधिक फटका बसतो तो प्रामाणिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांना. ज्यांनी कोणताही शॉर्टकट न वापरता अभ्यास केला, त्यांच्यावर अन्याय होतो. अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते, वर्षभराची तयारी वाया जाते, काहींचे वयोमर्यादेमुळे करिअर धोक्यात येते तर काही जण मानसिक नैराश्याच्या गर्तेत जातात. या मानसिक त्रासाची, वेळेची आणि आर्थिक नुकसानीची भरपाई कोण करणार? या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत कोणत्याही सरकारकडे नाही.
पेपरफुटी ही केवळ प्रश्नपत्रिका बाहेर पडण्याची घटना नाही; ती देशाच्या गुणवत्ता व्यवस्थेवर झालेला गंभीर आघात आहे. जर पैशाच्या जोरावर प्रश्नपत्रिका मिळू लागल्या, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता यांचे महत्त्वच संपुष्टात येईल.
अशा मार्गाने निवडलेले उमेदवार उद्या प्रशासनात, शिक्षणात, आरोग्य सेवेत किंवा इतर महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत झाले तर त्याचा फटका संपूर्ण समाजाला बसणार आहे. प्रश्न असा आहे की अशा घटना वारंवार का घडतात? यामागे परीक्षा यंत्रणेतील निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, संगनमत, प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेतील त्रुटी, डिजिटल सुरक्षेचा अभाव, कठोर शिक्षेची कमतरता आणि तपासातील विलंब ही प्रमुख कारणे आहेत
अनेकदा मोठे मासे सुटतात आणि काही किरकोळ आरोपींवर कारवाई करून प्रकरण संपवले जाते. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही सरकार, परीक्षा यंत्रणा, शिक्षक, पालक आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.