Asia Cup Rising Stars India A Loss: 'आशिया कप राइजिंग स्टार्स' क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे भारतीय 'ए' संघाचे स्वप्न भंगले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेश 'ए' संघाने भारतीय 'ए' संघाचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. विशेष म्हणजे, भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन संधी मिळाल्या होत्या. एक मुख्य सामन्यात आणि दुसरी सुपर ओव्हरमध्ये, परंतु भारताने या दोन्ही संधी गमावल्या. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघास एकही धाव करता आली नाही, ही अत्यंत निराशाजनक बाब ठरली.
आशिया कप राइजिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत भारतीय कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 6 गडी गमावून 194 धावा केल्या. एक वेळ बांगलादेश (Bangladesh) 180 धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत असताना अखेरच्या दोन षटकांमध्ये त्यांनी जोरदार फटकेबाजी करत 190 हून अधिक धावांचा डोंगर उभारला.
195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य यांनी वादळी केली. वैभवने केवळ 15 चेंडूंमध्ये 28 धावा कुटल्या, ज्यात दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. नमन धीर (7 धावा) लवकर बाद झाला, पण प्रियांश आर्य आणि कर्णधार जितेश शर्मा यांच्यात एक चांगली भागीदारी झाली. भारताचा विजय आता निश्चित वाटत असतानाच, हे दोन्ही फलंदाज थोड्या थोड्या वेळाने बाद झाले.
सामन्याच्या शेवटच्या षटकापर्यंत रोमांच कायम होता. भारताला (India) शेवटच्या 6 चेंडूंवर 16 धावांची गरज होती. आशुतोष शर्मा आणि नेहाल वढेरा क्रीजवर होते. षटकातील तिसऱ्या चेंडूवर आशुतोष शर्माने षटकार ठोकून विजयाच्या आशा वाढवल्या, तर चौथ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर आशुतोष बाद झाला. आता शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी 4 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर चौकार लागला नाही, पण भारतीय फलंदाजांनी धावत तीन धावा पूर्ण केल्या. यासह सामना टाय झाला आणि निर्णय घेण्यासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला.
सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. कर्णधार जितेश शर्मा आणि रमनदीप सिंह फलंदाजीसाठी आले. मात्र, पहिल्याच चेंडूवर जितेश शर्मा बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आशुतोष शर्मालाही पहिल्याच चेंडूवर बाद करण्यात आले. याचा अर्थ सुपर ओव्हरमध्ये भारताने दोन विकेट्स गमावल्या आणि एकही धाव केली नाही. बांगलादेशला विजयासाठी फक्त 1 धाव करायची होती, जी त्यांनी एक विकेट गमावून सहज पूर्ण केली आणि भारताला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय 'ए' संघासाठी हा पराभव अत्यंत वेदनादायक आणि निराशाजनक ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.