
Team India Record: भारतीय संघाने टी-20 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत मोठ्या दिमाखात विजेतेपद पटकावले. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने शेवटच्या षटकात सहज गाठले. तिलक वर्मा, कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने या विजेतेपदाला गवसणी घातली.
भारताच्या (India) विजयाचा पाया गोलंदाजांनी रचला. फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या 4 षटकांमध्ये केवळ 30 धावा देत 4 महत्त्वपूर्ण बळी घेतले आणि पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. कुलदीपच्या प्रभावी गोलंदाजीमुळेच पाकिस्तानचा संघ मोठ्या धावसंख्या उभारु शकला नाही. कुलदीपव्यतिरिक्त अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रभावी गोलंदाजी केली. त्यांच्या या सांघिक प्रयत्नामुळे पाकिस्तानचा डाव 146 धावांत गुंडाळला गेला.
दरम्यान, 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी युवा फलंदाज तिलक वर्मा याने शानदार खेळी खेळली. जबाबदारीने फलंदाजी करताना त्याने 69 धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी तिलक वर्माला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवम दुबेसह अन्य फलंदाजांच्या मदतीने भारताने शेवटच्या षटकात हा विजय साकारत आशिया चषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवताच भारतीय संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक विश्वविक्रम स्थापित केला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक सामने जिंकणारी टीम इंडिया (Team India) जगातील पहिला संघ ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पाकिस्तानला आतापर्यंत 9 वेळा पराभूत केले. तसेच, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेस करतानाचा विजयाची टक्केवारी 100 टक्के आहे.
यापूर्वी हा विक्रम मलेशियाच्या नावावर होता, ज्यांनी थायलंडविरुद्ध 8 सामने जिंकले होते.
तसेच, या विजयासह भारतीय संघाने आशिया कपमध्ये (एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही फॉरमॅटसह) एकूण 50 सामने जिंकण्याचा ऐतिहासिक टप्पा पार केला. आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात 50 सामने जिंकणारी भारतीय टीम ही पहिली टीम बनली. भारताने आतापर्यंत एकदिवसीय आशिया कपमध्ये 35 आणि टी-20 आशिया कपमध्ये एकूण 15 सामने जिंकले. कुलदीप, तिलक आणि इतर खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाने केवळ विजेतेपदच मिळवले नाही, तर क्रिकेटच्या इतिहासात दोन मोठे विक्रमही नोंदवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.