Caste System
Caste System Dainik Gomantak
ब्लॉग

Hindu Caste System: विद्याधर आणि चाड्डी

गोमन्तक डिजिटल टीम

तेनसिंग रोद्गीगिश

गोव्यातील ख्रिश्चनांमध्ये आढळणाऱ्या चाड्डी नावाच्या समुदायाचे कोडे उलगडण्याचा आम्ही प्रयत्न या पूर्वीच्या लेखांमधून केला आहे. चाड्डी हे क्षत्रियच आहेत हे आम्ही प्रामाणिकपणे सिद्ध केले आहे.

आम्ही हेदेखील सिद्ध केले आहे की हिंदूंमध्ये चाड्डी का नाहीत, याचे साधे कारण आहे की शिवाजी महाराजांच्या स्वर्गारोहणानंतर, मराठा नावाला आदर मिळाला आणि उर्वरित मराठ्यांच्या प्रांताप्रमाणेच कोकणातील हिंदूंनी स्वतःला मराठा म्हणणे पसंत केले.

(संदर्भ : पिसुर्लेकर, १९३६ : ओ एलिमेंटो हिंदू दा कास्टा चाड्डो, ओ ओरिएंत पोर्तुगीज, खंड ३०, २०४) कोकणी मराठा हे कोकणी चाड्डी समाजाचा भाग आहेत आणि म्हणूनच ते क्षत्रियही आहेत. त्यामुळे, शिवाजी महाराजांची ओळख राजपूत वंशज म्हणून करून देणे अनावश्यक होते.

क्षत्रिय हे चतुर्वर्णा व्यवस्थेमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेली जात किंवा वर्ण नाही हेदेखील आपण सिद्ध करू शकलो आहोत; क्षत्रिय म्हणजे गंगा सिंधूच्या मैदानातील मूळ रहिवासी. ते कोकणात स्थलांतरित झाले असावेत.

कोकणी क्षत्रिय किंवा चाड्डी हे त्या क्षत्रिय रहिवाशांनी द्वीपकल्पातील वडुकरांबरोबर नातेसंबंध जुळल्यानंतर निर्माण झालेला नवीन समुदाय असावेत. कदाचित पुढच्या पिढीत त्यांचे प्रमाण व संख्या अधिक प्रमाणात वाढली असावी.

परंतु, अद्याप आपण ‘चाड्डी’ या शब्दाच्या व्युत्पत्तीचे रहस्य उलगडू शकलो नाही. क्षत्रिय शब्दापासून हा शब्द आला असावा, असे म्हणणे धाडसाचे असले तरी अगदीच असंबद्ध नाही. गंगा-सिंधू मैदानातून स्थलांतरित झालेले लोक पूर्वी स्थानिक क्षत्रिय असलेल्या दख्खनमध्ये आणि त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर आले.

याबाबत आपण दख्खनच्या पशुपालकांवरविचार मांडताना आधी चर्चा केली आहे. पशुपालक म्हणजे गुरे, शेळ्या, म्हशी चरणारे. पशुपालकांना कोणत्याही एका प्राण्यापुरते मर्यादित ठेवता येत नाही. कारण ते गंगासिंधूच्या मैदानातून (गुरे) ओलसर पानझडी जंगलात (म्हशी) आणि दख्खनच्या दुष्काळी जमिनी (शेळ्या)कडे गेल्यावर हे प्राणी बदलत गेले.

मला असे वाटते की पशुपालकांचे पशूंना चरायला नेणे किंवा चारा देणे (कोकणीत चारो दिवप) यावरून चाड्डी हे नाव त्यांच्याशी जोडले गेले असावे. स्वत:ला ब्राह्मण म्हणणाऱ्या आर्यांनी त्यांना क्षत्रिय हे नाव दिले. क्षत्रिय म्हणजे रक्षक; आणि ब्राह्मणांना तेच तर हवे होते.

पशुपालक हेच क्षत्रिय आहेत, हे गृहीतक स्वीकारण्यास काही इतिहासकार कचरतात. चरवणारे ते चारडी, यावरून पुढे चाड्डी ही व्युत्पत्ती वर्दे वालावलकरांना अमान्य आहे. कारण, ज्या समाजाने अनेक राजे निर्माण केले आहेत, तो गुरेढोरे पाळणाऱ्यांइतका खालच्या दर्जाचा असू शकत नाही, असे त्यांचे मत (संदर्भ : वलावलकर, १९२८ : गोयंकारांची गोयांभायली वसणूक, २५) पण, ऐतिहासिक पुरावा त्यांच्या म्हणण्यास साथ देत नाही.

बौद्ध व जैन मानसिकतेची परंपरा असलेला या शांतताप्रिय समुदायाने आवश्यकता असेल तेव्हाच शस्त्रे उचलली. त्यांच्यापैकी काही राजे बनले; बाकीचे पशुपालक राहिले, तर काही शेतकरी म्हणून स्थायिक झाले. त्यांच्याजवळ सिंहासनाधिष्ठित होण्याचा वारसा नव्हता.

जे सिंहसनावर बसले त्यापैकी चंद्रगुप्त मौर्यासारख्या अनेक जणांनी अखेरीस जैन भिक्षू बनण्यासाठी सिंहासनाचा त्याग केला. काहींनी आपणास यादव - गुराखी म्हणवून घेण्याची लाज बाळगली नाही. (संदर्भ : यादव, २००६ : फॉलोअर्स ऑफ कृष्णा - यादवाज ऑफ इंडिया, १०९) चोलमंडल यादवराय राजा बिट्टरस हा गुरेढोरे पाळणाऱ्या कुटुंबातून आला होता.

विजयनगरच्या संगम घराण्याची स्थापना करणारा हक्क किंवा हरिअप्पा, देवगिरीच्या यादवांचा धाडियप्पा आणि होयसळांचा बिट्टिगा; शिवाजी महाराज आणि अहल्याबाई होळकर यांचे मूळही पशुपालक समाजात आहे. (संदर्भ : ढेरे, : शिखर शिंगणापूरचा श्रीशंभूमहादेव, श्रीविठ्ठल : एक महासमन्वयक आणि लोकदेवतांचे विश्‍व)

ब्राह्मण संख्येने कमी व लढण्याची मूळ प्रवृत्ती नसलेले लोक. त्यांनी पशुपालकांना त्यांचे संरक्षण करायला लावले व त्यांना ‘क्षत्रिय’ असे आकर्षक व मोहक पद दिले. पूर्वीच्या लोकांना जाणवत असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेचे आणि ती दूर करण्यासाठी गुरेढोरे चरवणारे यांच्याशी त्यांनी केलेल्या धोरणात्मक युतीचे उत्कृष्ट उदाहरण ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलात येते, ज्यात भारद्वाज, ’आमच्या शत्रूंना दूर पांगवण्यासाठी’ पूषणाला प्रार्थना करतात.

(ऋग्वेद ०६.०५३.००४) पूषण हा बहुधा खेडूतांचा देव, काठी धरून आणि जाड लोकरीचे घोंगडे घातलेला, गुरांच्या कळपांचे रक्षण करत आणि गोपाळांना मार्ग दाखवत असे वर्णन केले आहे. हे वर्णन विठ्ठलाशी खूप मिळतेजुळते आहे.

क्षत्रिय हे सिंधू, यमुना आणि गंगा या भूगर्भीय प्रदेशातील रहिवासी आहेत, हे लक्षात घेतल्यास त्यांचे प्रारंभी पशुपालक असणे व कालांतराने शेतीत स्थायिक होणे साहजिक आहे. तसेच त्यांनी प्रसंगी शस्त्र उचलणेही स्वाभाविक आहे.

गुरेढोरे पाळणारा समुदाय बहुधा प्रशासन आणि स्वसंरक्षणाच्या उद्देशाने एखादे छोटे राज्य म्हणून संघटित झाला होता आणि जे लोक राजे बनले त्यांच्यापैकी बहुतेक हे या संस्थानांचे प्रमुख होते. ’आदिवासी प्रमुख’ या नावाने त्यांना अनेकदा संबोधले जाते. भारताचा हा भाग राजेशाहीच्या उत्क्रांतीचा साक्षीदार होता, ही गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे.

मानव धर्मशास्त्र हा बहुधा बृहन्भारतात गेल्यावर आलेल्या गोंधळलेल्या वास्तवात सुव्यवस्था शोधण्यासाठी आर्याने रचलेला एक चतुर नियम ग्रंथ असावा. एका सुव्यवस्थित जगात देवाबरोबर मध्यस्थी, समुदायाचे संरक्षण, व्यापार आणि वाणिज्य आणि क्षुल्लक सेवा, श्रम विभागणीच्या कायद्याद्वारे शासित करणे आवश्यक होते.

कदाचित राजपूत हा एकमेव समुदाय जो युद्धाच्या परंपरेत अडकल्याच्या खुणा सापडतात. परंतु हे त्यांना कराव्या लागलेल्या प्रदीर्घ लढाईचा परिणाम असू शकतो. त्यामुळे, मोठमोठ्या अडचणींशी दोन हात करून टिकून राहिले.

कदाचित त्यामुळेच असावे की, इतिहासातील सर्व क्षत्रियांना त्यांच्या पराक्रमाची ओळख मिळावी म्हणून, राजपूत वंशाशी नाते जोडून दाखवणे आवश्यक वाटले.

सासष्टीच्या काही किनारी भागांत असलेल्या खेड्यांतील कुटुंबांचा एक छोटासा गट, ज्यांना चाड्डी म्हटले जाते, ते आहेत तरी कोण? या प्रश्‍नाने मला बरेच गोंधळात टाकले होते. ते इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत;

उंची आणि त्वचेचा रंग यासारखे त्यांचे भौतिक गुणधर्मही भिन्न आहेत. ‘हे सूर्यासारखे तेजस्वी, अनेक कलांचे आणि कर्तृत्वाचे निपुण आणि उल्लेखनीय शौर्याचे वीर’ केवळ गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण दख्खनमध्ये आढळतात.’

असे गेल्या लेखात आपण म्हटल्याप्रमाणे ते विद्याधर म्हणजेच गंगासिंधू मैदानातील शुद्ध क्षत्रिय असावेत. उर्वरित कोकणी चाड्डी समुदाय हा गंगासिंधू मैदानातील क्षत्रिय व वडुकर यांचा एकमेकांशी नातेसंबंध आल्यामुळे उदयास आलेला नवीन समुदाय असावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT