Landslide|Environment
Landslide|Environment Dainik Gomantak
ब्लॉग

Environment: गोष्ट एका हिमालयीन पर्वतराजीतील प्रसिद्ध पुरातन गावाच्या खचण्याची

दैनिक गोमन्तक

Environment: आजकाल जोशीमठ हे उत्तरांचल प्रदेशातील एक प्रसिद्ध व पुरातन हिमालयीन गाव पूर्णपणे खचून जाऊन, तिथल्या शेकडो घरांना व रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याच्या व जात असल्याच्या बातम्या सतत येत आहेत.

त्यामुळे, सगळेच गाव खचू लागल्याची वस्तुस्थिती पुढे येत आहे. उत्तरांचल सरकार व केंद्र सरकार व आपत्कालीन व्यवस्थापनाद्वारे आणीबाणी पद्धतीने बचावकार्य, काम सुरू झालेले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेऊन एकूण एक परिस्थिती तिथून नियंत्रित केली जात आहे व हाताळली जात आहे. सर्वांत जास्त व मोठे तडे पडलेल्या घरांतील सगळ्या लोकांना सुरक्षित स्थानी पोहोचविले जात आहे. हल्ली उच्च न्यायालयाने पण याच्यावर सुनावणी घ्यायला सुरू केले आहे.

सर्वांत अद्ययावत माहितीप्रमाणे गावातील एक साडेतीनशे मीटर रुंदीचा पट्टा सगळ्यांत जास्त धोकादायक असल्याचे उघडकीस आले आहे. त्यात जवळपास सातशे घरांना आजपर्यंत बाधा पोहोचल्याचे समजते.

जोशीमठाची ही समस्या काही नवीन नव्हे. यावर जवळपास 1976पासून सरकारी व निमसरकारी संस्थांतून अभ्यास सुरू होता व वेळोवेळी इशारे दिले जात होते. पण असे घरांना तडे जाण्याची परिस्थिती, एकदम संपूर्ण गावच किंवा गावाचा मोठा भाग भूस्खलन होऊन खचणे ही तशी एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे.

या कारणास्तव असे भूस्खलन का होते, संपूर्ण गाव कशाला खचू लागतो, त्याचे शास्त्रोक्त विश्लेषण व कारणे वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न.

दोनशे दशलक्ष वर्षापूर्वी असलेला पृथ्वीचा पांगाईया हा अखंड असलेला असा महाखंड तुकडे होऊन वेगळा व्हायला लागला. त्याचे अनेक तुकडे होऊन एकमेकांपासून दूर सरकू लागले

(ड्रिफ्ट थिअरी). आल्फ्रेड वेगनर या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने 1911साली हा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताप्रमाणे तेव्हा भारत देशाचा सध्याचा भूभाग जो पूर्वी आफ्रिकेला खेटून होता तो त्यापासून वेगळा होऊन सध्याच्या आशियाच्या (तिबेटच्या) दिशेने सरकू लागला व शेवटी या दोन्ही भूभागांची महाकाय टक्कर झाली व त्या टक्करीत हिमालय पर्वतराजी तयार झाली.

असे म्हणतात की, हा प्रवास अजून थांबलेला नसून तो सध्या अतिशय हळुवार पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे हिमालय पर्वतरांगांची उंची अजूनही वाढतच आहे. दोन्ही खंडांचे भूभाग ( टेक्टॉनिक प्लेट) जे वितळलेल्या खडकांच्या रसावर तरंगत असतात,

ते एकमेकांवर आपटून सतत घर्षण होत आहे. त्यामुळे हिमालयीन क्षेत्र हे भूविज्ञानाच्या दृष्टीने सगळ्यांत अस्थिर ठरलेले आहे व ते देशातील सर्वांत मोठे भूकंपप्रवण क्षेत्र ठरलेले आहे.

बहुतेक हिमालयीन प्रदेश स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून भूकंपरोधक संरचनेत सर्वोच्च हानीच्या म्हणजे पाच क्रमांकाच्या क्षेत्रांत मोडतात, जे क्षेत्र भारतीय द्वीपकल्प किंवा गोवा राज्य (तीन क्रमांक) यांच्या मानाने दुप्पट हानीचे आहे. भूविज्ञानाच्या दृष्टीने हिमालयीन प्रदेश एकदम अस्थिर व असुरक्षित मानला जातो.

हिमालय पर्वतराजीत आसाम, काश्मीर व नेपाळ परिसरात छोटेमोठे भूकंप सतत होत असतात. वर नमूद केल्याप्रमाणे जोशीमठ, ज्याला ‘ज्योतिर्मठ’ नावानेही ओळखले जाते, एक अतिशय प्राचीन व पुरातन गाव आहे.

असे म्हणतात की ते एक त्याहून पुरातन अशा भूस्खलन होऊन कोसळून तयार झालेल्या अनैसर्गिक भरावावरच ते उभारण्यात आले. त्यामुळे हा भराव घट्ट खडकाचा नसून कोसळलेल्या मातीचा व दगडांचा आहे, ज्यामुळे त्याला भारवाहक क्षमता नाही.

हिंदू धर्माचे आद्य प्रवर्तक आदिशंकराचार्य यांनी सातव्या शतकात चार धार्मिक पिठे; द्वारका, शृंगेरी, पुरी व जोशीमठ येथे स्थापन केली, त्यापैकी हे एक पीठ.

तसेच हे गाव बद्रीनाथ व हेमकुंठ साहेबजी तीर्थयात्रांचे महाद्वार होऊन बसलेले असल्याने गावाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. इथे भारतीय भूसेनेची एक मोठी छावणीही आहे जी चिनी सीमेला सगळ्यांत जवळची असल्याने एकदम महत्त्वपूर्ण मानली जाते.

या सगळ्या कारणांमुळे गावाचा मोठ्या प्रमाणात अनियंत्रित विस्तार होऊ लागला. जोपर्यंत त्या जागेवर मोठ्या इमारती व घरांची गर्दी व वजन जास्त नव्हते तोपर्यंत ते गाव सुरक्षित होते. हजारो घरे व इमारतीचे वजन, भूस्खलन होऊन तयार झालेल्या त्या कमकुवत भरावावर पडू लागले, जो नैसर्गिकरीत्या एवढा भार घेण्यास सक्षम नव्हता.

गावाचे सगळे सांडपाणी पण त्या भरावात झिरपायला लागले. त्याशिवाय इथे जवळपास वीज उत्पादन प्रकल्प उभारण्यात येत आहे ज्याचा बोगदा जवळच्या जमिनीखालून गेल्याने जोशीमठाच्या कमकुवत भरावातील भूवैज्ञानिक संतुलन व समतोल बिघडल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे, भरावाच्या भूगर्भात अनेक बदल झाल्याचे बोलले जाते. भूगर्भीय पाण्याचा प्रवाह अडला, वळला किंवा वळवला गेला असल्यास भरावाच्या स्थिरतेला बाधा पोहोचू शकते. त्याचप्रमाणे जोशीमठाच्या दोन्ही बाजूला प्रमुख भूवैज्ञानिक भूकंपप्रवण दोष रेषा (फॉल्ट लाइन) आहेत.

2021 साली नंदादेवी हिमनदी फुटून जोशीमठाच्या आसपास पूर येऊन जवळपास 200 लोक मृत्युमुखी पडले होते. या सगळ्या कारणांमुळे पुरातन काळातील भूस्खलन होऊन जो भराव तयार झालेला होता, ज्याच्यावर संपूर्ण जोशीमठ गाव बसलेला आहे, तो कमकुवत होऊन खचू लागलेला आहे.

रस्त्यावर व घरांना मोठे तडे गेलेले आहेत. इमारती कललेल्या आहेत. गावाच्या लोकसंख्येला मोठा धोका निर्माण झालेला आहे. अशाच परिस्थितीत भूकंप आला तर त्यामुळे बसणाऱ्या हादऱ्यांनी हा भराव आणखी कमकुवत होऊन मोठी दुर्घटनाही होऊ शकते.

आता तर जोशीमठापासून 82 किमी दूर असलेल्या कर्णप्रयाग गावातही घरांना भेगा पडू लागल्या असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे हे असंतुलन जोशीमठापुरते सीमित आहे की, पूर्ण हिमालयीन क्षेत्रात पसरलेले आहे, याविषयी भीती निर्माण झालेली आहे.

दैवी योगायोगाने भारतीय द्वीपकल्प (पेनिन्सुला) हा भूकंपप्रवण क्षेत्रांत येत नाही. गोवा राज्य हे भारतीय द्वीपकल्पाचे अविभाज्य अंग आहे व इतर भूकंपप्रवण क्षेत्रापासून दूर आहे. तसेच ते भूविज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत स्थिर आहे. या अनेक कारणांनी अख्खे गाव किंवा शहर भूस्खलन होण्याची भीती गोव्यात नाही.

काही छोट्या जागांचे किंवा भूखंडांचे भूस्खलन होऊ शकते. नुवे, मडगाव व सत्तरी येथे अशा घटना पूर्वी घडलेल्या आहेत. पण काहीच लोकवस्ती नसल्याने नुकसान झाले नाही. पण, तशी परिस्थिती हिमालयीन राज्यांत नाही.

हा सगळाच प्रदेश अस्थिर आहे आणि एकदम भूकंपप्रवण आहे. त्याशिवाय जागतिक तापमान वाढीमुळे हिमनदी फुटून, बर्फ वितळून पूर येऊ शकतात व अनैसर्गिक भराव ज्याच्यावर शहरे बसलेली आहेत कमकुवत होऊ शकतात.

म्हणून असल्या धोकादायक प्रदेशांत नवी शहरे वसवताना, विस्तार करताना, त्यांच्या पायाभूत सुविधा बांधताना नाजूक पर्यावरणाची एकदम काळजी घेण्याची, संतुलन ठेवण्याची, तांत्रिक खबरदारी घेण्याची व आपत्कालीन व्यवस्था तंतोतंत पद्धतीने तयार ठेवणे ही काळाची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Laxmikant Parsekar: पार्सेकरांची झाकली मूठ कायम, गूढ वाढले! तानावडे पुन्हा घेणार भेट; पाऊणतासाची बैठक निर्णयाविना

Tivim Crime: पैशांच्या वसुलीसाठी अभियंत्याचे अपहरण; कोलवाळ पोलिसांनी तिघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

देशवासीयांना आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT