

बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा आपल्या समाजसेवेच्या कार्यामुळे चर्चेत आला आहे. आसममध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. अशा संकटग्रस्त कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी सलमान खानने 'आशियाना – होप बिगिन्स विथ अ सेफ शेल्टर' या उपक्रमाला पाठिंबा देत मदतीचा हात पुढे केला आहे. या मोहिमेअंतर्गत पूरग्रस्तांसाठी एकूण 500 घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत आसममधील पूरग्रस्त भागात घरबांधणीचे काम सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात सुमारे 220 अर्धपक्की घरे तयार करण्यात आली आहेत. या घरांमुळे अनेक कुटुंबांना पुन्हा सुरक्षित आयुष्याची नवी सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे. पुढील टप्प्यात उर्वरित घरे पूर्ण करून शेकडो कुटुंबांना कायमस्वरूपी आधार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश केवळ घर उपलब्ध करून देणे नसून, नैसर्गिक आपत्तीनंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना सुरक्षित वातावरण, आत्मविश्वास आणि नव्याने उभे राहण्याची संधी देणे हा आहे.
सलमान खान अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. शिक्षण, आरोग्य आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी तो सातत्याने योगदान देत असल्याने त्याच्या या निर्णयाचे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. अनेक चाहत्यांनी त्याला 'रिअल लाइफ हिरो' म्हणत त्याच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे.
असममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केवळ सलमान खानच नव्हे, तर इतर काही कलाकारही पुढे आले आहेत. काहींनी पूरग्रस्त भागात जाऊन अन्नधान्य, औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे, तर काही जण विविध मदत मोहिमांमध्ये सहभागी झाले आहेत.
असममधील पूरग्रस्तांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांमध्ये सलमान खानचा सहभाग अनेकांसाठी आशेचा किरण ठरत असून, त्याच्या या पुढाकारामुळे आणखी लोकांनी मदतीसाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.