
Mumbai To Ratnagiri Ro-Ro Boat Service: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ते रत्नागिरी दरम्यान रो-रो बोट सेवा लवकरच सुरु होणार आहे. यामुळे रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी आणि वेळखाऊ प्रवास टाळून अवघ्या काही तासांत कोकण गाठणे शक्य होणार आहे.
जलद प्रवास: ही अत्याधुनिक रो-रो बोट 24 नॉटिकल माईल्स प्रति तास वेगाने धावणार आहे. यामुळे मुंबईहून (Mumbai) रत्नागिरीला अंदाजे तीन ते साडेतीन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे, तर मालवण आणि विजयदुर्गला साडेचार तासांत पोहोचता येईल.
क्षमता: 55 कोटी रुपयांची ही नवी रो-रो बोट एकाच वेळी 500 प्रवासी आणि 150 वाहने (खाजगी गाड्या, दुचाकी, बस) घेऊन प्रवास करु शकते.
प्रवाशांसोबत वाहनेही: या सेवेमुळे प्रवासी आपल्या खासगी गाड्या घेऊन थेट कोकणात जाऊ शकतील. यामुळे रस्त्यावरचा प्रवास, इंधन खर्च आणि थकवा टाळता येईल.
पावसाळ्यातही सेवा: ही बोट विशेष तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने पावसाळ्यातही जलवाहतूक करणे शक्य होणार आहे.
गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा (Goa) महामार्गावरील रखडलेली कामे, खड्डे आणि गणेशोत्सवातील प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत होती. रेल्वे तिकिटांचा तुटवडा ही देखील एक मोठी समस्या होती. या पार्श्वभूमीवर, रो-रो सेवेमुळे कोकण प्रवास आता अधिक आरामदायी, वेगवान आणि सोयीचा होणार आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून परवडणाऱ्या दरात हा नवा जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करुन दिला जात आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, 1964 नंतर मुंबई ते कोकण जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर बंद झाली होती. आता अनेक वर्षांनंतर ही सेवा पुन्हा सुरु होत असल्याने कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.