
Shaktipith Highway Farmers Protest: नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ महामार्गास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध तीव्र झाला आहे. कसल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गा होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. जीव गेला तरी जमीन देणार नाही, असे म्हणत शेतकऱ्यांनी महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करत आंदोलन केले.
महाराष्ट्रातील बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनास मंजूरी दिल्याने शेतकऱ्यांचा हा विरोध आणखी तीव्र झाला आहे.
दरम्यान, जर महामार्गासाठी बळजबरीने जमिनी घेतल्या जात असतील तर आम्ही हे होऊ देणार नाही. गरज नसताना शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले. महामार्गाच्या भूसंपादनाला आमचा विरोध असून जीव गेला तरी एक इंचभरही जमीन देणार नाही. या महामार्गाच्या माध्यमातून सरकार आमची फसवणूक करत असल्याचे देखील आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले. राज्य सरकार जर शक्तीपीठ महामार्गावर ठाम असेल तर आम्हीही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असेही पुढे शेतकऱ्यांनी म्हटले. मराठवाड्यातील बीड, धाराशिव तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर आणि कोकणातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शक्तिपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. 30 हजार कोटींमध्ये तयार होणारा रस्ता 86 हजार कोटींमध्ये करुन 50 हजार कोटींची लूट त्यांना करायची आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्गाची काही गरज नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेण्याचा हा सरकारचा डाव असल्याचे देखील शेट्टी म्हणाले.
नागपूर (Nagpur) ते गोव्याला जोडणारा 805 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग यासह पंढरपूर तसेच, अंबेजोगाईसहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग असेल. दुसरीकडे, कोल्हापूरातील शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी (24 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादनास मंजूरी देण्यात आली. त्यासाठी 20 हजार कोटींची तरतूदही करण्यात आली.
नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर (Solapur), कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा असा हा महामार्ग जाणार आहे. महामार्गासाठी बारा जिल्ह्यातील 27 हजार 500 एकर जमीन हस्तांतरीत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.