

नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये रविवारी इतिहास घडवत टी-२० विश्वविजेतेपद सलग दुसऱ्यांदा मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर बीसीसीआयने बक्षिसांचा वर्षाव केला आहे. तब्बल १३१ कोटी रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा केली.
ही बक्षीस रक्कम संघातील १५ खेळाडू आणि प्रशिक्षक टीम आणि सपोर्ट स्टाफ यांना विभागून देण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार या १३१ कोटींमधील मोठा वाटा खेळाडूंना असणार आहे. त्यानंतर जबाबदारीनुसार सपोर्ट स्टाफला उर्वरित रक्कम विभागून देण्यात येणार आहे.
गतवेळच्या तुलनेत यंदा बक्षीस रकमेत सहा कोटींची वाढ करण्यात आली आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या विजेत्या संघाला १२५ कोटी देण्यात आले होते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ खेळाडूंना प्रत्येकी सुमारे सहा कोटी रुपये मिळतील, तर उर्वरित ४१ कोटी सपोर्ट स्टाफमध्ये विभागून देण्यात येतील.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला आणि टी-२० विश्वकरंडक उंचावला. सलग दुसऱ्यांदा हे यश मिळवणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला. इतकेच नव्हे तर तीनदा टी-२० विश्वकरंडक जिंकण्याचाही मान भारताला मिळाला आहे.
दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादव आज मुंबईत परतला. मायदेशात हा करंडक जिंकणे फार सन्मानाचे होते. आता पुढचे टार्गेट ऑलिंपिक सुवर्णपदक आहे. त्यानंतर पुढील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतही विजेतेपद मिळवून आम्हाला हॅट्ट्रिक करायची आहे, असे मत सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.
रोहित शर्माने गतवेळेस मिळवलेल्या विजेतेपदाशी तुलना करण्याबाबत सांगितले असता सूर्यकुमार म्हणाला. महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्या पंक्तीत मी आलो आहे, याचा फार मोठा आनंद आहे. भविष्यात अधिकाधिक करंडक जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल.
कपिलदेव यांच्या संघाने १९८३ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक जिकला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पहिल्या वहिला टी-२० विश्वकरंडकाचे विजेतेपद मिळवण्यात आले होते. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक जिंकला. रोहित शर्माने २०२४ मध्ये टी-२० आणि चॅम्पियन्स करंडक जिंकून दिले.
यंदाच्या स्पर्धा सुरू होण्याअगोदर मी धोनीला भेटलो होतो. आयसीसी स्पर्धा खेळताना कशी मानसिकता हवी याबाबत त्याने सल्ला दिला. आपला हा संघ उत्तम क्षमतेचा आहे आणि विजेतेपद मिळवण्याची क्षमता असल्याचेही त्याने मला सांगितले होते.
२८ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता असलेल्या आयपीलएकडे आता लक्ष असून, त्यानंतर ऑलिंपिकचे सुवर्णपदक हे पुढची ध्येय असल्याचा पुनरुच्चार सूर्यकुमारने केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.